सुधागड ः येथील टेंबी व शिक्षक वसाहती जवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंड ची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय गुरांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. संरक्षक भिंत नसल्याने डम्पिंग ग्राउंड मधील कचरा मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्त झाला आहे. रस्त्यावर देखील आला आहे. तसेच या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा जाळला जातो. परिणामी मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
ओला व सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याच शास्त्रीय पद्धतीचा वापर होतांना दिसत नाही. किंवा कचऱ्यावर विलगीकरणाची प्रक्रिया देखिल केली जात नाही. परिणामी घंटा गाडी अथवा कचारा गाडीतुन डंपिग ग्राऊंडमध्ये ओला-सुका कचरा एकत्रितरित्या गोळा करुन टाकला जातो. आणि तेथेच तो जाळला जातो. परिणामी सुका कचरा अनेक दिवस तशाच जळत राहतो त्यामूळे मोठया प्रमाणात विषारी धुर निर्माण होऊन वायु प्रदुषण होते.
डम्पिंग ग्राऊंड आद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये कंपोस्ट पिट्स (खत खड्डे) आणि एम.आर.एफ. शेडचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. कंपोस्ट खत खड्ड्यांचे काम पूर्ण होताच ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. एम.आर.एफ. शेडमध्ये सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले जाईल, तसेच प्लास्टिक बेलिंग मशीनचा वापर करून प्लास्टिक कचऱ्याचे कॉम्प्रेस्ड बेल्स (गठ्ठे) तयार केले जातील. सुरक्षा भिंतीच्या (कंपाउंड) बांधकामासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.माधुरी मडके, मुख्याधिकारी, नगरपंचायत, पाली
या डम्पिंग ग्राउंडच्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे दुर्लक्ष आहे. नगरपंचायतने डम्पिंग ग्राउंड बंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुरांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. एकीकडे क्रीडा मैदानाला कोट्यावधीचा निधी आणि दुसरीकडे नागरिकांच्या व गुरांच्या आरोग्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होत आहे.कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली