रायगड : किशोर सुद
आपले लोकप्रतिनिधी निवडताना मतदार आजही उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेला विशेष महत्व देत नसल्याचे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. याही निवडणुकीत मतदारांनी तिसरी-चौथी शिक्षण असलेल्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 नवनिर्वाचित सदस्यांपैकी 20 जण फक्त नववीपर्यंत शिकलेले आहेत. तर 20 सदस्यांचे शिक्षण दहावी ते बारावीपर्यंत आहे. 19 सदस्य हे उच्च शिक्षित आहेत. काही ठिकाणी उच्च शिक्षितांना मतदारांनी नाकारले आहे. त्यामुळे अल्पशिक्षित सदस्य प्रशासनावर वचक ठेवून नागरिकांचे प्रश्न किती प्रभावीपणे सोडवू शकतील, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
लोकशाहीचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आजही किमान शैक्षणिक पात्रतेची गरज भासत नाही. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत अल्पशिक्षित लोकप्रतिनिधींनाही चांगली जाण असते, त्यामुळे मतदारही आपल्या लोकप्रतिनिधीच्या शैक्षणिक पात्रतेबाबत गंभीर नसतात. आपल्या भागातील सर्व प्रश्नांची जाणीव असणारा, ते प्रश्न सोडविण्याची झटणारा, प्रसंगांमध्ये मदतीला धावणाऱ्या उमेदवाराला पसंती दिली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अल्पशिक्षित असूनही मतदारांवर आपल्या कामाच्या माध्यमातून प्रभाव पाडणारे उमेदवार निवडणुकीत विजयी होताना दिसतात. उच्च शिक्षित, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीही निवडणुकीला सामोरे जात असले तरी त्यांचे निवडणूक लढविण्याचे व विजयी होण्याचे प्रमाण कमीच आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या 59 सदस्यांच्या निवडणुकीसाठी 173 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 54 उमेदवार हे फक्त तिसरी ते नववीपर्यंत शिकलेले होते. त्यातील 20 उमेदवारांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. 173 पैकी 61 उमेदवारांचे शिक्षण हे दहावी ते बारावीपर्यंत झालेले होते. त्यातीलही 20 उमेदवार विजयी झाले आहेत. तर उर्वरित 58 उमदेवार हे पदवी व तत्सम शैक्षणिक पात्रता असलेले होते. त्यापैकी फक्त 19 उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषद एकूण 59 सदस्यांपैकी 40 म्हणजेच 68 टक्के सदस्यांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झालेले आहे.
59 सदस्यांच्या निवडणुकीत काही गटांमध्ये उच्चशिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित अशी ही लढत झाली. या लढतीमध्ये उच्चशिक्षित उमेदवाराच्या तुलनेत कमी शिक्षण असलेले उमेदवार विजयी झाल्याचे पाहायला मिळाले. पेण तालुक्यातील जिते येथील भाजपाच्या ताई दरवडा यांचे शिक्षण तिसरीअसून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बारावी शिक्षण असलेल्या अरुणा पवार यांचा पराभव केला तर उरणमधील चाणजे येथे भाजपाचे अकरावी शिक्षण असलेल्या रिना घरत यांनी ठाकरे गटाच्या एमए शिक्षण असलेल्या उमेदवाराचा पराभव केला. अलिबागमध्ये आंबेपूर गटात शिवसेना शिंदे गटाच्या रसिका केणी यांचे शिक्षण बारावीपर्यंत असून त्यांनी भाजपाच्या चित्रा पाटील यांचा पराभव केला. चित्रा पाटील यांचे शिक्षण एमबीएपर्यंत आहे. याच गटात एलएलबी असलेल्या शेकाप पूजा भगत, अपक्ष स्मिता पाटील यांचाही पराभव झाला आहे. आवास गटात शिवसेना शिंदे गटाचे पाचवीपर्यंत शिक्षण असलेले दिलीप भोईर यांनी काँग्रेसचे राजेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे.
राजेंद्र ठाकूर हे इंजिनिअर आहेत. कोर्लई गटातून शिवसेनेच्या ज्योती नागावकर यांनी भाजपच्या ॲड. मनस्वी मोहिते यांचा पराभव केला. निजामपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्ो बारावीपर्यंत शिक्षण असलेल्या अविनाश नलावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. राजू साबळे यांचा पराभव केला. सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गटातून शिंदे गटाच्या शर्मिला बोडके या नववी पर्यंत शिक्षण असलेल्या उमेदवाराने भाजपाच्या ॲड. नीलिमा पाटील यांचा पराभव केला. जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेले ॲड. राजीव साबळे, ॲड. निलिमा पाटील, चित्रा पाटील यांनी मागील जिल्हा परिषदेच्या कामकाजावर आपला ठसा उमटविलेला यापूर्वी पहायला मिळालेले आहे. मात्र राजकीय खेळीत या अभ्यासू उमेदवारांना दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, निवडणुकीत अपक्ष 19 उमेदवार उभे होते. त्यातील एक उच्च शिक्षित, नववीपर्यंत 7, दहावी-बारावीपर्यंत शिक्षण झालेले 9, पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले 2 उमेदवार रिंगणात होते. मनसे 2, आप 1, वंचित बहुजन आघाडी 3, सीपीआय 1 आणि बीएसकेपीचा 1 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी एकही उमेदवार विजयी झालेला नाही.