अलिबाग: उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक नसलेल्या वाहनांविरोधात रायगड जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई हाती घेतली आहे. १ जुलै ते २६ जुलै दरम्यान ३३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १ लाख ६६ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.
राज्य शासन आणि परिवहन विभागाच्या निर्देशानुसार सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांची सुरक्षित ओळख, बनावट नंबरप्लेटला आळा घालणे, तसेच चोरीच्या वाहनांचा माग काढणे अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात वाहतूक पोलिसांकडून विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांची तपासणी करून संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे.
१ जुलै ते २६ जुलै दरम्यान ३३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
वाहतूक विभागाने सर्व वाहनधारकांना आपल्या वाहनांवर तातडीने अधिकृत एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरोधातील कारवाई आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.