Roha Panchayat Samiti
रोहा : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने रोहा तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न डोके वर काढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोहा पंचायत समितीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी मार्चपासून काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पंचायत समितीच्या अहवालानुसार तालुक्यातील सुमारे २० गावे आणि ७ वाड्यांवर पाणीटंचाईची शक्यता आहे. यामध्ये वासगाव आदिवासीवाडी, पाटणसई, पिंगळसई, न्हावे, नवखार, सोनखार, धामणसई, इंदरदेव परिसर, धोंडखार, दापोली, करंजविरा, शेणवई, डोंगरी, झोळांबे, निडी, लक्ष्मीनगर, भातसई, तळाघर, बोरघर, लांढर आदी गावांचा समावेश आहे.
पाणीटंचाई निर्माण झाल्यास या भागांना टँकर व बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी सुमारे १३.५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
याशिवाय, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तालुक्यातील १० गावे व २ वाड्यांमध्ये नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी २४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच २४ गावे व १४ वाड्यांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून त्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरवर्षी मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत असतानाही उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणे हा चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे बारमाही वाहणारी कुंडलिका नदी असतानाही तिच्या काठावरील काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
गेल्या काही वर्षांत तालुक्यात विविध पाणीपुरवठा योजना राबवून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम असल्याने या योजनांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.