Rain in the Raigad
दरड, पूरप्रवण गावांवर प्रशासनाचा वॉच File Photo
रायगड

Raigad Rain | जिल्ह्यात अति मुसळधारेचा इशारा ; दरड, पूरप्रवण गावांवर प्रशासनाचा वॉच

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः हवामान विभागाने रायगड (Raigad Rain) जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच जुलै अखेरपर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे जिल्ह्यातील दरडप्रवण अन् पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत

जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची काल रात्री दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला.अंबा व कुंडलिका नदीची पातळी इशारास्तरापर्यंत आहे. या नद्याजवळच्या गावातील प्रशासनाने घेतलेली खबरदारी, पर्यायी व्यवस्था, यंत्रणेची सुसज्जता याची माहिती घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पाऊस, संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले जिल्हा प्रशासन कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत शिबिरे म्हणून वापरता येतील अशा इमारती प्रशासनाने ओळखल्या आहेत. तहसीलदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असतील याची खात्री करण्यास सांगितले आहे. आवश्यकते नुसार स्थलांतर करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही सांगितले. विविध विभाग तसेच तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामग्री सुस्थितीत आहे का याची तपासून खात्री करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभाग, बंदर विभाग आदी महत्त्वाच्या विभागांना त्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने मदतकार्यासाठी आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. संबंधिताना सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हवामान खात्याने पुढील काही दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील काही दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या क्षेत्रातील सर्व धोकादायक स्थळंचा अभ्यास करून आपत्ती उद्भवल्यास करावयाच्या उपाय योजनासाठी कृती आराखडा तयार ठेवावा.सर्व शासकीय विभागप्रमुखांनी प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या सूचनेनुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून अलर्ट मोड’ वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी यावेळी दिल्या.

नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज (Raigad Rain)

जिल्हाप्रशासन फूड पॅकेट्स, प्रथमोपचार किट आदीची व्यवस्था, आरोग्य साधनांची व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन साधनांची व्यवस्था आदींसह कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास सज्ज आहे. नागरिकांनी कोणत्याही आपत्तीत घाबरू नये. प्रशासन नागरिकांची काळजी घेण्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सतर्क आहे. अचूक व अधिकृत माहिती तात्काळ उपलब्ध करून द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

जनतेने शासनाच्या सूचनांचे पालन करावे. कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपत्ती काळात जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, घाबरून न जाता सतर्क रहावे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी
SCROLL FOR NEXT