नागोठणेः येथील अंबा नदीने रविवार 14 जुलै रोजी धोक्याची पातळी ओलांडून शहरात पुरस्थिती निर्माण झाली. त्यावेळी पुराच्या पाण्यात अडकलेली दोन चारचाकी वाहने व तीन व्यक्ति तसेच नदी किनारी असलेल्या शेड मधील दोन व्यक्तींना येथील कोळी बांधवांनी आपला जीव धोक्यात घालून मोठ्या साहसाने वाचविण्यात यश मिळवीले. त्यांच्या या यशाबद्दल शहर व विभागातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
शहरात रविवारी सकाळ पासूनच पुराचे पाणी शिरल्याने नदी किनारी असलेले व्यापारी व कोळी वाड्यातील रहिवासी आपले सामान सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या गडबडीत असताना दुपारच्या सुमारास येथील बांधवांना हॉटेल लॅकव्हयूच्या समोरील रस्त्यावर पाण्यात अर्ध्याहून अधिक बुडालेल्या गाडीच्या टपावर उभे राहून कोणी तरी हात वर करून इशारा करत असलेले दिसले त्यावेळी संदीप कोळी,टिळक कोळी,सचिन कोळी,बळीराम कोळी,मनीष कोळी,महेश कोळी,सुमित कोळी,रूपेश कोळी व त्यांचे इतर सहकारी अशा 15 जणांच्या टीमने आपल्या तीन ते चार होड्या घेऊन घटनास्थळी जाऊन या कॅम्पर गाडीतील दोन व्यक्तीं व गाडीला बाहेर काढले.
गाडीतील व्यक्तींनी मागे एक गाडी येत असताना सरकारी विश्राम गृहाच्या समोरील रस्त्यावरुन पाण्याच्या वेगाने नदी बाजूला गेली असल्याचे सांगताच सर्व टीम त्या ठिकाणी गेली व झाडीत अडकलेली गाडी व त्यातील एका व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी गाडीत एक महिला व दोन लहान मुले होती . त्यांना या आधीच बाहेर काढल्याचे समजले. तसेच ही टीम नेहमीप्रमाणे पूर आल्यानंतर कोणी पाण्यात अडकले आहे का? हे बघण्यासाठी जात असतात. यावेळी ते सकाळच्या सुमारास पुरात पहाणी करताना नदीकिनारी असलेल्या शेडमध्ये दोन व्यक्तीं अडकल्याचे दिसले त्यांनाही यांनी सुरक्षित बाहेर काढले. सदर टीमने दोन चार चाकी गाड्या व त्यातील तीन व्यक्ति तसेच शेडमधील दोन व्यक्ति अशा दोन गाड्या व पाच माणसांना आपला जीव धोक्यात घालून वाचविल्याबद्दल विभागातून कौतूक व त्यांचे अभिनंदन होत आहे.मदत केल्याचे समाधानी या युवकांना मिळाले.