रायगड ः वातावरणातील बदल लहरी पाऊस आणि खारलॅन्ड विभागाचे दुर्लक्ष अशा दुहेरी संकटात रायगडचा बळीराजा सापडला असला, तरी आगामी खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात यंदा 73 हजार 265 हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, उत्पादकतेचा सरासरी लक्ष्यांक 2995 किलो प्रति हेक्टर इतका निश्चित केला आहे.
खारेपाटातील शेती धोक्यात; खारलॅन्ड विभागाबाबत नाराजी
कोकणातील खाडी किनारच्या समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती शासनाच्या खारलॅन्ड विभागाकडून केली गेली तर कोकणातील तब्बस 65 हजार हेक्टर नापीक भातसेती जमीन पिकती होवून, कोकण देशात भात उत्पादनात नंबर एकचा विभाग ठरु शकेल. मात्र खारलॅन्ड विभाग, कृषी विभाग आणि महसुल विभाग यांच्यात कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने हे वास्तवात उतरत नसल्याचे दिसून येत आहे.
शासनाने या बाबत गांभीर्याने विचार करुन कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे नंदन पाटील यांनी पूढे म्हटले आहे.खारलॅन्ड, कृषी आणि महसूल विभागात समन्वय नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जर 65 हजार हेक्टर नापीक जमीन दुरुस्तीअभावी पडून राहिली नसती, तर कोकण भात उत्पादनात देशात अव्वल ठरू शकले असते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
तरुण पिढाची भातशेतीकडे पाठ
भातशेती संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. आणि वातावरणातील बदल आणि लहरी पावसामुळे भातशेती नुकसानीमध्ये जात असल्याने नवी तरुण पिढी भातशेती करण्यास इच्छूक नसल्याने भातशेती लागवडीखालील क्षेत्र घटत असल्याचे कारणही गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहे. त्याच बरोबर समुद्र संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल दुरुस्ती खारलॅन्ड विभागाने गेल्या काही वर्षांपासून केली नसल्याने पावसाळ्यात समुद्र संरक्षक बंधारे फुटून सागरी उधाणाचे खारेपाणी पिकत्या भातशेती क्षेत्रात येत असल्याने जिल्ह्यातील खाडी किनारी भागातील तसेच खारेपाट क्षेत्रातील पिकते भातशेती क्षेत्र दिवसेदिवस कमी होत असल्याचे खारेपाटातील शेतकरी नंदन पाटील यांनी सांगीतले.
लागवड क्षेत्रात पेण तालुका आघाडीवर
जिल्ह्यात सर्वाधिक भात लागवड पेण तालुक्यांत 11,297 हेक्चर आणि अलिबाग तालुक्यात 10,401 हेक्टर प्रस्तावित आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये महाड 8,850 हेक्टर, कर्जत 8,476, मुरुड 2746, खालापूर 2430,पनवेल 3346, उरण 2331, माणगांव 7338, तळा 1072, सुधागड 2344, महाड 8850, म्हसळा 1395 तर श्रीवर्धन तालुक्यांत लागवड क्षेत्र 1170 हेक्टर आहे.
यंदा सुधारित बियाणांचा वापर आणि वेळेवर लागवड करून उत्पादन वाढवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, तरुण पिढीचा शेतीकडे कमी होणारा ओढा आणि सरकारी विभागांमधील समन्वयाचा अभाव हे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे.
गेल्या वर्षीच्या नुकसानीनंतर यंदा कडेकोट नियोजन
गतवर्षी खरीप 2025 मध्ये कापणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे भाताची उत्पादकता 2081.32 किलो प्रति हेक्टर पर्यंत खाली घसरली होती. ही घट भरून काढण्यासाठी 2026 च्या हंगामात उत्पादकतेचा उच्चांक गाठण्याचे कृषी विभागाचे ध्येय आहे. तालुकानिहाय उत्पादकता लक्ष्यांक निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार रोहा तालुक्यास सर्वाधित 3600 किलो प्रति हेक्टर लक्षाक देण्यात आला आहे. त्याखालोखाल उरण तालुक्यांस 3077 किलो प्रति हेक्टर, अलिबाग तालुक्यांस 3018 किलो प्रति हेक्टर तर पोलादपूर तालुक्यांस 2259किलो प्रति हेक्टर लक्षांक निश्चित करण्यात आला आहे.