Mumbai Goa Highway Safety Risk
पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील जुन्या मार्गावर काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या केबल जोडणीच्या कामानंतर साईड पट्टीवर टाकलेली माती पहिल्याच पावसात वाहून गेल्याने साईड पट्टी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत असून, संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
जुन्या कशेडी बंगल्यापासून भोगावपर्यंतच्या मार्गावर केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेली भरावाची कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पहिल्याच पावसात माती खचल्याने रस्त्यालगत चिखल निर्माण झाला असून वाहनचालकांसह गुरेढोरे घेऊन जाणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक चंद्रकांत जाधव यांनी या संदर्भात चिंता व्यक्त करताना, पावसाळ्यात शेतकऱ्यांची गुरे रस्त्यालगतच्या गटारात अडकून जखमी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. या निकृष्ट कामामुळे भविष्यात नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी साईड पट्ट्या खचल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत रस्ता निसरडा झाल्याने अनेक वाहने घसरल्याच्या घटना घडल्या असून, रत्नागिरी जिल्ह्यात माती रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रायगड जिल्ह्यातही एका दिवसात अपघातांच्या घटना घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी परिस्थितीची तातडीने पाहणी करून साईड पट्ट्यांची दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.