Mahad Narali Purnima Savitri River Pooja
महाड : महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त सावित्री नदीचे विधिवत पूजन करून नारळ अर्पण करण्यात आला. मागील काही वर्षांपासून खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आल्याने समाधान वाटत असल्याचे मत देवस्थानचे सरपंच दीपक शेठ वारंगे यांनी व्यक्त केले.
सावित्री नदीच्या काठावर वसलेल्या महाड शहराने या नदीचे अनेकदा रौद्ररूप अनुभवले आहे. विशेषतः २०२१ मध्ये आलेल्या महापुराने महाडमध्ये मोठी हानी झाली होती. या पार्श्वभूमीवर नारळी पौर्णिमेच्या दिवशी सावित्री नदीचे पूजन करून तिचा प्रकोप टळावा आणि नदी शांत राहावी, अशी प्रार्थना करण्याची परंपरा आहे.
यंदाही श्री विरेश्वर देवस्थानच्या वतीने ही परंपरा जपण्यात आली. दुपारी श्री विरेश्वर मंदिरात पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नारळाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर वाद्यांच्या गजरात शहरातील मुख्य बाजारपेठेतून गांधारी नाक्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तेथून सावित्री नदीला विधिवत नारळ अर्पण करण्यात आला.
पूजेनंतर सावित्री मातेला महाड शहरातील नागरिकांवर कृपादृष्टी ठेवून त्यांना सुख-समृद्धीचे आशीर्वाद द्यावेत आणि भविष्यात नदीला पूर येऊन कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, अशी प्रार्थना करण्यात आली.
२०२१ च्या महापुरानंतर श्री विरेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने दर नारळी पौर्णिमेला सावित्री नदीला नारळ अर्पण करण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामदैवताच्या वतीने नारळ अर्पण केल्यानंतर शहरातील नागरिक आणि व्यापारीही नदीला नारळ अर्पण करतात.
या कार्यक्रमाला श्री विरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दीपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, संजय पवार, साहिल पार्टे, अनंत शेठ, सुभाष शिंदे, नगरसेवक हेमंत चांदलेकर, दीपक चव्हाण, अक्षया हेलेकर, संकेत वारंगे, प्रज्ञा गांधी, पुजारी जंगम बुवा, पूजा जगताप, मंगेश जगताप, उमेश मिंडे, विजय जाधव, आशुतोष साळुंखे यांच्यासह व्यापारी, पदाधिकारी, देवस्थानचे सदस्य, महाडकर नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.