जयंत धुळप
रायगड: रायगड जिल्ह्यातील तीव्र दरडप्रवण 225 गावांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आता थेट गावागावांत सेंट्रलाईज्ड पब्लिक ॲड्रेस सिस्टिम ( सीपीएएस) बसवण्यात येत आहे.
आता पर्यंत 225 गावांपैकी 100 गावांमध्ये ही सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली असून येत्या पावसाळ्या पूर्वी उर्वरित 125 गावांमध्येही कार्यान्वित होईल अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.
रायगड जिल्ह्यात एकुण 392 गावे दरडप्रवण आहेत.त्यातील दरडप्रवण श्रेणी-1 मध्ये 18 गावे आहेत. श्रेणी-2मध्ये 71, श्रेणी-3 मध्ये 159 ,श्रेणी-4 मध्ये 49,आणि दरडप्रवण श्रेणी 5मध्ये 22 गावांचा समावेश आहे. त्यांतील 73 गावांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने विशेष सर्वेक्षण केले असल्याचे पाठक यांनी सांगीतले.
पोलादपूर मध्ये सर्वाधिक 140 गावे दरडप्रणव
392 दरडप्रणव गावांपैकी सर्वाधिक 140 गावे पोलादपूर तालुक्यांत तर महाड तालुक्यांत 121 गावे आहेत. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांत अलिबाग 9, मुरुड 9, कर्जत 5,खालापूर 12,रोहा 20,सुधागड 9, म्हसळा 14,श्रीवर्धन 12,माणगांव 22, पेण 13, तर पनवेल व तळा तालुक्यांत प्रत्येकी 3 गावे आहेत. उरण तालुक्यांत दरडप्रणव गांव एकही नाही.
कशी काम करणार सीपीएएस प्रणाली?
सीपीएएस या प्रणालीचे मुख्य नियंत्रण अलिबाग येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आहे. हवामान विभागाकडून पावसाचा किंवा धोक्याचा इशारा मिळाल्यास, नियंत्रण कक्षातून एकाच वेळी सर्व गावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना प्रसारित केल्या जातील.
जीएसएम आधारित यंत्रणा
जिल्हा स्तरावरून अधिकारी थेट बोलून सूचना देऊ शकतील किंवा रेकॉर्ड केलेले संदेश ऐकवता येतील. तातडीची परिस्थिती उद्भवल्यास ग्रामस्थांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवण्याची सुविधा आहे. जीएसएम आधारित ही यंत्रणा मोबाईल नेटवर्कवर चालत असल्याने कोणत्याही ठिकाणाहून ऑपरेट करणे शक्य आहे.
वीज पुरवठा खंडित झाल्यास ही यंत्रणा बंद पडू नये यासाठी त्याला 21 दिवसांचा इन्व्हर्टर बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही बॅटरी अवघ्या दोन तासांत जलद चार्ज होऊ शकते. पावसाळ्यात अनेकदा दुर्गम भागातील संपर्क तुटतो.
अशा वेळी ही सेंट्रलाईज्ड सिस्टिम अत्यंत प्रभावी ठरणार आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी 225 ठिकाणी हवामानाचा अंदाज पोहोचवणे शक्य झाल्यामुळे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळेल, असा विश्वास सागर पाठक यांनी व्यक्त केला आहे.या उपक्रमामुळे रायगडमधील दरडग्रस्त गावांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार असून, तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्ती निवारण अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.