रायगड: गेल्या सुमारे दोन वर्षांपासून रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या राजकीय कळीचा आणि टिपेच्या संघर्षाचा पालकमंत्री पदाचा राजकीय तिढा अखेर सुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
महायुतीमधील ज्येष्ठ नेते, महाडचे आमदार, शिवसेना पक्षाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली जाण्याचे स्पष्ट संकेत सुत्रांनी दिले आहेत.
रायगडच्या पालकमंत्रीपदा संदर्भात मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून टोकाची रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी या पदाचा आग्रह धरला जात होता, तर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी ठाम होते.
दरम्यान नुकत्यांच झालेल्या विधान परिषदेच्या जागावाटपाच्या तडजोडीनुसार हा तिढा सोडवण्यात आल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्यासाठी सोडण्याच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या भरत गोगावले यांना देण्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.
लवकरच यावर अंतिम निर्णय होईल : खा. तटकरे
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात या विषयावर सखोल चर्चा झाल्यानंतर स्वतः खा.सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना, हा विषय आता फार काळ प्रलंबित न राहता लवकरच यावर अंतिम निर्णय होईल,असे सांगत सकारात्मक संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फ़णवीस यांच्या बरोबर या बाबत चर्चा झाल्यावर निर्णय अंतिम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.