रायगड: संपूर्ण रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाचा भक्तिमय उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (आज) १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात रायगड जिल्ह्यात एकूण २९१ सार्वजनिक आणि १ लाख ५ हजार ५४ खाजगी अशा एकूण १ लाख ५ हजार ३४५ गणपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तयारी अखेरच्या क्षणापर्यंत सुरु होती. तर घरगुती गणपती रविवारी घरी आणण्याची लगबग सुरु होती. पावसानेपण हजेरी लावल्याने, पावसाचा अंदाज घेवून घरगुती गणपती आणण्याकरिता गणेशभक्त कार्यशाळांमध्ये जाताना दिसून येत होत.
सोमवारी प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या गणपतींपैकी १६ हजार १७५ गणपती सहा दिवसांचे म्हणजे गौरी विसर्जन पर्यंतचे आहेत. दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सहा दिवस (गौरी-गणपती), सात दिवस, दहा दिवस आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी अशा टप्प्याटप्प्याने हे विसर्जन पार पडेल. जिल्ह्यातील विसर्जनासाठी १३ समुद्रकिनारे, ४ खाड्या, ५४ नद्या आणि २११ तलावांसह इतर विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ७ पोलीस उपअधीक्षक, २९ पोलीस निरीक्षक, १२८ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, १९०० पोलीस अंमलदार आणि ५०० होमगार्ड यांचा समावेश आहे.
याशिवाय बाहेरून अतिरिक्त ३० पोलीस अधिकारी व ३०० अंमलदार मागवण्यात आले असून एसआरपीएफची १ कंपनी, ४ आरसीपी तुकड्या, १ क्यूआरटी आणि ११ स्ट्रायकिंग फोर्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोणत्याही अप्रिय घटना टाळण्यासाठी दहशतवादी विरोधी पथक आणि सोशल मीडिया देखरेख पथक सतर्क राहणार आहेत.
चाकरमानी आणि गणेशभक्तांच्या प्रवासाचा अनुभव सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत खारपाडा ते कशेडी दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्गावर (एन.एच. ६६) खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी. आणि पोलादपूर अशा १० ठिकाणी विशेष सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत.