नाते : ईलियास ढोकले
स्वराज्याची राजधानी आणि शिवप्रेमींचे अस्मिता केंद्र असलेल्या किल्ले रायगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. किल्ले रायगडवरील शिवसमाधी आणि राजदरबारातील सुरक्षा कठडे खराब झाले आहेत.
राजदरबारात राजसदरेवर आणि शिवसमाधी स्थळाचे पावित्र्य जपण्यासाठी त्याच प्रमाणे सुरक्षेच्या कारणांसाठी लाकडी सुरक्षा कठडे बसवण्यात आले आहेत. या सुरक्षा कठड्यांच्या लाकडी भागांना अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी ते तुटले आहेत. तुडलेल्या कठड्यांचा कापडाच्या चिंध्या बांधून वापर केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधी स्थळी वणव्यामुळे आग लागली होती. आता महत्वाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा कठड्यांची दुरवस्था समोर आली आहे. यामुळे स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला त्याचबरोबर शिवप्रेमींच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या किल्ले रायगडाबाबत पुरातत्व विभाग दुर्लक्ष करीत आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.