महाड: किल्ले रायगडावरील सुरू असलेल्या कामांसाठी लागणारे साहित्यांची वाहतूक करणाऱ्या गाढवांपैकी पाच ते सहा गाढवांचा मृत्यू झाला आहे. या गाढवांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर या मृत गाढवांना कोंझर घाटात उघड्यावर टाकण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारा विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार गडावर सुरू असलेल्या प्राधिकरणाच्या व केंद्रीय पुरातत्त्वाच्या संवर्धन कामासाठी लागणारे साहित्य माणसांकरवी नेणे अशक्य असल्याने त्यासाठी गाढवांचा वापर संबंधित ठेकेदारांकडून केला जात आहे.
एक गाढव प्रतिदिवशी किमान पाच ते सहा वेळा गडावर फेऱ्या मारते. त्यातून ते बांधकाम साहित्य नेत असल्याची माहिती देण्यात आली. दुर्दैवाने ती मरण पावल्यावर त्यांच्यावर अशा पद्धतीने केलेल्या कार्यवाही बाबत नागरिकांकडून तीव्र स्वरूपात नापसंती व्यक्त होत आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक बांधकामे सुरू आहेत आणि या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य दगड गाढवांच्या माध्यमातून गाढव मेहनत करीत किल्ले रायगडावर पोहचवले जात आहेत.
किल्ले रायगड परिसरात ठेकेदारांमार्फत हजारो गाढव बांधून ठेवलेली आहेत यातील पाच ते सहा गाढवांचा मृत्यू झाला असून ही मेलेली गाढवे अज्ञात व्यक्तीने कोंझर घाटात पंधरा ते वीस फूट खोल दरीत उघड्यावर टाकून दिली असल्याचे समोर आले आहे. या मेलेल्या गाढवांवर संबंधित ठेकेदाराकडून अंत्यसंस्कार केले जात नसल्याने खंत व्यक्त होत आहे.
जुन्या मार्गावर या घाटात भयानक दुर्गंधी पसरली असून सदरची मृत गाढवे कोणी या दरीत टाकून दिली त्याचा शोध लागला नसल्याने या घटनेचा शोध लावणे गरजेचे आहे. मेलेल्या गाढवांना अशा पद्धतीने घाटात उघड्यावरटाकून दुर्गंधी पसरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्टच
एक गाढव प्रतिदिवशी किमान पाच ते सहा वेळा गडावर फेऱ्या मारते. त्यातून ते बांधकाम साहित्य नेत असल्याची माहिती देण्यात आली. पाच ते सहा गाढवांच्या मृत्यू होण्यामागे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाढवांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावे, अशी मागणी होत आहे.