Raigad forest fire pudhari photo
रायगड

Raigad forest fire : रायगडमध्ये जंगलांना वणवा लागण्याच्या घटना सुरूच

शासनस्तरावर जनजागृतीसह ठोस उपाययोजनांची आवश्यकता

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्ह्यात सध्या डोंगर दऱ्यामध्ये वणवे लागल्याच्या घटना सुरूच आहेत. अज्ञातांकडून खोडसाळपणे हे वणवे लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याला चाप बसण्यासाठी शासनस्तरावर कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

होळी सणाच्या दरम्यान वणवे लावण्याचे प्रकार सतत घडत असतात. वणवे टाळण्यासाठी शासनस्तरावर जनजागृती बरोबरच ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जंगलात निर्माण झालेले शुष्क वातावरण हे आगीच्या तीव्रतेला हातभार लावण्यास कारणीभूत ठरत आहे.

त्याचबरोबर विविध ठिकाणी विकृत मानसिकतेपोटी लावले जाणारे वणवे ही पर्यावरणासमोरील खूप मोठी समस्या बनली आहे. रोज कुठे ना कुठे वणवा लागल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. वणव्यामुळे अनेक पक्षी त्यांची घरटी, सरपटणारे प्राणी, सूक्ष्म जीव यांची मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होते ही मोठी चिंतेची बाब आहे.

याशिवाय जंगलातील नैसर्गिक व अनैसर्गिक वणव्याला निसर्गातील असमतोल यासाठी मानव अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे. ज्या परिसरामध्ये वणवा लागतो तेथील जमीन जैवविविधतेच्या दृष्टीने पुनर्स्थापित होण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो त्यामुळे जंगले विरळ होत चालली आहेत.

मानवनिर्मित वणवे बेकायदेशीर व अनैतिक सुद्धा आहेत याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. नैसर्गिक व अनैसर्गिक वणव्याच्या दाहकतेतून जंगलांना, निसर्गाला, पर्यावरणाला वाचवायचे असेल तर सरकारने वणवा मुक्त गाव योजना, आमचा गाव वणवा मुक्त गाव, प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेऊन वृक्षवली अभियान, वृक्षसंवर्धन मार्गदर्शन, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण देऊन वणवा विरोधी सशस्त्र पथक आदी पर्याया बरोबरच निसर्ग प्रेमी, वन्यजीव प्रेमी, पर्यावरणप्रेमी यांनी पुढे येऊन लोकांच्यामध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, तरच वर्तमानातील प्रदूषित वातावरणात सर्वांनाच मोकळा श्वास घेता येईल.

  • जंगलातील होणारी हानी थांबली जावी यासाठी वणवामुक्त गाव संकल्पना शासनामार्फत राबवावी. निसर्ग दूत तयार करून कोकणातील निसर्ग संपन्नतेचा अमोल ठेवा जतन करावा. यासाठी वनविभागाने एक पाऊल पुढे टाकावे. सोबत आपत्ती व्यवस्थापन यांनीही सहकार्य करावे. या संकल्पनासाठी सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मित्र मंडळांनी वसुंधरेला वाचविण्यासाठी सहभागी व्हावे, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT