Raigad Dams Pudhari
रायगड

Raigad Dams: आठ दिवसांत रायगडमधील २० धरणे फुल्ल

जिल्ह्यातील धरणांत ८८ टक्के पाणीसाठा; गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक; पाणीटंचाईची समस्या दूर

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: रायगड जिल्हयात जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. २८ लघु पाटबंधारे धरणांपैकी २० धरणे शंभर टक्के भरली असून या एकूण २८ धरणांमध्ये ८८.२२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा यावर्षी पाणीसाठ्याची सर्वाधिक टक्केवारी आहे.

गेल्या वर्षी पावसाने मे महिन्यापासून सुरुवात केली. मात्र यावर्षी २० जूननंतर मोसमी पावसाला सुरुवात झाली. पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने जिल्हयात पाणी टंचाईची स्थिती गंभीर बनवी होते.

अखेरपर्यंत ८४ टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. मागील वर्षांतील टँकरच्या संख्येचा विक्रम असावा असे सांगितले जाते. त्यामुळे सर्वचजण मोसमी पावसाची आतुरतेने वाट पहात होते.

अखेर २० जून नंतर रायगड जिल्ह्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली. सुरवातीला पावसाचा जोर कमी होता. मात्र जून महिन्याच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हाहाकार उडवून दिला.

या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला असून, जिल्ह्यातील २७ पैकी तब्बल २० धरणे शंभर टक्के भरली आहेत. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून ८८.२२ टक्के जलसाठा असून, ८९.३६ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले आहे.

त्यामुळे गेल्या महिनाभरापासून निर्माण झालेले पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील साळोख आणि अवसरे या धरणांतील जलसाठा अद्यापही केवळ २७ ते ३१ टक्क्यांवर असल्याने याकडे प्रशासनाचे लक्ष कायम आहे.

कोलाड येथील रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत एकूण २८ धरणे असून, त्याद्वारे ग्रामीण व शहरी भागातील लाखो नागरिकांना पिण्याचे पाणी, सिंचन तसेच विविध प्रकल्पांसाठी पाणीपुरवठा केला जातो. भातासह इतर पिकांच्या शेतीलाही या धरणांमधील पाण्याचा मोठा आधार आहे.

यंदा जूनच्या पहिल्या तीन आठवड्यांत समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील धरणांतील जलसाठा धोकादायकरीत्या घटला होता. अनेक प्रकल्पांमध्ये केवळ २ ते १० टक्के पाणी शिल्लक राहिले होते, तर काही धरणे जवळपास कोरडी पडली होती.

परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. प्रशासनाला ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता आणि सुमारे दीड लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला.

सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश प्रकल्प तुडुंब भरले. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या श्रीगाव, ढोकशेत, कार्ले, रानीवली, साळोख, अवसरे, उसरण आणि पुनाडे या धरणांमध्ये अद्याप पूर्ण क्षमतेने पाणी साठलेले नसले, तरी उर्वरित २० धरणे शंभर टक्के भरली आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित धरणांतील जलसाठ्यातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT