रायगड: रायगड जिल्हयातील उन्हाळी पर्यटचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. मागील काही महिन्यांत वाढत्या उष्णतेमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर दरवर्षीपेक्षा पर्यटकांची संख्या कमी राहिली. मात्र रविवारी रायगड जिल्हयातील विविध समुद्र किनारे पर्यटकांच्या गर्दी फुलून गेले. किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी आणि प्रमुख मार्गावर वाहतूककोंडी असे चित्र रविवारी होते.
जिल्हयातील पर्यटनाचा सर्वात मोठा हंगाम उन्हाळ्यात असतो. शाळाना सुट्ट्या असल्याने मे महिन्यात पर्यटनासाठी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडतात. मे महिन्यात लाखो पर्यटक रायगड जिल्हयात येत असतात.
यातून पर्यटन व्यावसायही मोठ्या तेजित राहतो. यावर्षी मात्र उन्हाळी पर्यटन हंगामावर अनेक संकटे आली आहेत. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थिती याचा परिणाम विविध क्षेत्रावर होऊ लागला आहे. पेट्रोल, डिझेल दर वाढ होत आहे. एलपीजी सिलेंडरचा तुटवडा सुरुवातीच्या काही काळात जाणवला.
त्यामुळे हॉटेल, वाहतूक या पर्यटनाशी संबंधित सेवांवर परिणाम झाला आहे. या मुख्य सेवांचे दर वाढल्याने इतर पर्यटन सुविधांवर परिणाम झाला आहे. या शिवाय मे महिन्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
समुद्र किनारी भागात उष्ण आर्द्रतेच्या वातावरणामुळे उकाडा आणखी तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे याचा परिणाम पर्यटकांवर झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात गेल्या वर्षी प्रमाणे गर्दी दिसून आली नाही. मात्र अखेरच्या टप्प्यात किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.
साहसी खेळ थांबणार
जिल्ह्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवरील साहसी खेळांना पर्यटकांकडून मोठी पसंती दिली जाते. मात्र 26 मेपासून जलवाहतूक आणि किनाऱ्यांवरील सॅरासिलिंग, बनाना राईड, स्पीड बोटी आदी खेळ 31 ऑगस्टपर्र्यंत बंद राहणार आहेत.