पोलादपूर: पोलादपूर महाबळेश्वर राज्य मार्गवरील पोलादपूर व महाबळेश्वर तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या दृष्टीने पोलादपूर ते कुंभारोशी हा आंबेनळी घाट मार्ग अत्यंत महत्त्वाचा संपर्कमार्ग आहे.
या मार्गावरून महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावांचा रायगड जिल्ह्याशी थेट संपर्क राहतो. या साठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या मार्गावर एसटी बसेस सुरू करावी अशी मागणी संतोष हरिभाऊ जाधव अध्यक्ष, मायभवानी, संस्था प्रतापगड यांनी केली आहे.
जिल्ह्याधिकारी याच्या मार्फत १६ ऑगस्ट पर्यत अतिवृष्टी लक्ष्यात घेता सदरचा घाट मार्ग सर्वच वाहतुकीला बंद ठेवण्यात आला होता मात्र सद्य स्थितीत या मार्गावरील बंदी वाढविण्यात आली नसल्याने सर्व वाहतुकीसाठी मार्ग खुला झाला आहे.
या मुळे या एसटी सेवा पूर्वत करणे गरजेचे बनले आहे. या पत्र द्वारे या भागातील नागरिकांना प्रवासाचे साधन नसल्याने गैरसोय होत आहे. पावसाळ्यात या घाटमार्गावर दरडी कोसळणे, रस्त्यावर माती व दगड येणे, रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच काही ठिकाणी संरक्षक कठडे व सुरक्षाव्यवस्थेचा अभाव यामुळे एसटी वाहतूक बंद ठेवण्यात येते.
परिणामी या परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण, कर्मचारी व कामगारांचा प्रवास, तसेच बाजारपेठ व आरोग्य सेवांशी असलेला संपर्क प्रभावित होत आहे.
त्यामुळे पोलादपूर-कुंभरोशी आंबेनळी घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती, दरड प्रतिबंधक उपाययोजना, महसूल प्रशासन, पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी करून मार्ग वाहतुकीस योग्य असल्याची खात्री करण्यात यावी.
त्यानंतर पोलादपूर ते कुंभारोशी आंबेनळी घाट मार्ग एसटी बस वाहतुकीसाठी शक्य तितक्या लवकर खुला करून नियमित एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
घाटमार्ग सुरू करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच पावसाळ्यात मार्गावर निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींचा तातडीने निपटारा करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. या मार्गावरील एसटी सेवा सुरू झाल्यास महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, रायगड व सातारा जिल्ह्यांमधील ग्रामीण भागाचा संपर्क अधिक सुलभ होण्यास मदत होईल. तरी सदर मागणीची गांभीर्याने दखल घेऊन पोलादपूर-कुंभारोशी आंबेनळी घाट मार्गाची सुरक्षितता तपासून, आवश्यक उपाययोजना पूर्ण करून एसटी वाहतूक सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी.- संतोष हरिभाऊ जाधव, अध्यक्ष, मायभवानी संस्था प्रतापगड