किनेश्वरवाडी येथे डोंगरावरून आला दगड  pudhari photo
रायगड

Poladpur | पोलादपूर तालुक्यात पावसाने थैमान, दरडग्रस्त 75 कुटुंबांचे स्थलांतर

केवनाळे, नाणेघोळ, साखर सुतारवाडी या गावांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा
पोलादपूर शहर ः धनराज गोपाळ

गेली चार दिवस पोलादपूर तालुक्यात पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. तर वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशार्‍यामुळे पोलादपूर आपत्ती निवारण युद्ध पातळीवर प्रयत्नशील असून या कामी तालुका प्रशासन व स्वतः तहसीलदार कपिल घोरपडे यांनी ठिकठिकाणी भेटी देत दरडग्रस्त गावांना व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन अनेक कुटुंब सुरक्षित स्थळी हलविली आहेत.

यामध्ये साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त एकूण 5 कुटुंब व एकूण 28 लोक राजीप शाळा सुतारवाडी साखर येथे सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तर केवनाळे येथील शेडमध्ये लाईट कनेक्शन जोडणी करून 50 कुटुंब व 130 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच नाणेघोळ येथील भनगे आळी 10 लोक, वरची आळी 11 लोक, मंदिर आळी 20 लोक, खालची आली 20 लोक असे एकूण 20 कुटुंबातील 61 जणांना दरडग्रस्त कुटुंबातील लोकांना केवनाळे येथील शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरित कुटुंबांना पाण्याची व वैद्यकीय सुविधा तातडीने मिळावी यासाठी तहसीलदार कपिल घोरपडे यांनी पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी भीती देऊन डॉक्टर व कर्मचार्‍यांना सूचना दिली आहेत. या भेटीदरम्यान तहसीलदार कपिल घोरपडे यांचे समवेत मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

सध्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केल्यामुळे पोलादपूर तालुका प्रशासन अलर्ट मोडवर असून दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती निवारणामार्फत सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. अतिवृष्टी दरम्यान कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून या कामी तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, व आपत्ती निवारण कक्ष दक्ष असल्याचे दिसून येत आहे.

किनेश्वरवाडी येथे डोंगरावरून आला दगड

पोलादपूर तालुक्यात सध्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत असून रात्रीच्या सुमारास किनेश्वर वाडी 150 मीटर अंतरावर डोंगरावरून मोठमोठे दगड खाली घसरत आल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती समजतात पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे, मंडल अधिकारी राठोड, तलाठी फुलवर यांच्यासह गटविकास अधिकारी दीप्ती गाट, सहाय्यक गटविकास अधिकारी हंबीर, गटशिक्षणाधिकारी संजय वसावे व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचा उपाय म्हणून येथील 24 ग्रामस्थांना अंगणवाडी व शाळागृह येथे स्थलांतरित केले आहे. किनेश्वर वाडी गावापासून 150 मीटर अंतरावर दगड खाली आल्याने गावातील वस्तीत असलेले एकूण 17 कुटुंब 63 लोकसंख्या पैकी राहणारे 7 कुटुंब स्थलांतरित केले असल्याची माहिती आपत्ती निवारण कक्षाकडून देण्यात आली आहे. याबरोबरच गावातील नागरिकांना सुरक्षितते कामी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT