राजकुमार भगत
उरण: तालुक्याला लाभलेल्या निसर्गरम्य पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने येथे येणारे पर्यटक समुद्राच्या पाण्यात अडकण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
शनिवारी संध्याकाळी देखील अशीच एक थरारक घटना घडली, ज्यामध्ये मुंबईहून पर्यटनासाठी आलेले एक जोडपे समुद्राच्या पाण्यात सुमारे १५० मीटर आत अडकले होते. सुदैवाने, स्थानिक सागरी सुरक्षा रक्षक आणि उरण पोलिसांच्या तत्परतेमुळे या जोडप्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मुंबईहून आलेले हे जोडपे शनिवारी दुपारी ५ च्या सुमारास पिरवाडी बीचवर आले होते. त्यावेळी ओहोटी असल्याने किनारा पूर्ण सुका होता. त्यामुळे ते समुद्रात बरेच पुढे गेले. मात्र, संध्याकाळी अचानक भरती सुरू झाली आणि आजूबाजूला कधी पाणी भरले, याचा अंदाज त्यांना आला नाही. संपूर्ण परिसर पाण्याने वेढल्याने ते दोघेही मध्यभागी अडकले आणि मदतीसाठी हाका मारू लागले.
समुद्रात अडकलेल्या या जोडप्याला पाहून स्थानिक सागरी सुरक्षा रक्षक आणि पोलीस मित्र आशिष काटे आणि मित्र यांनी तातडीने उरण पोलीस ठाण्याला माहिती दिली. उरण पोलिसांचे बीट मार्शल आणि सागरी रक्षक लाइफ जॅकेट घेऊन तात्काळ मदतीसाठी धावले.
समुद्रात सुमारे १५० मीटरचा पल्ला पार करत, २० ते २५ मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या जोडप्याला पाण्यातून सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले. "रेस्क्यू टीमच्या मदतीमुळेच आमचा जीव वाचला, अशी प्रतिक्रिया या पर्यटकांनी दिली.
पिरवाडी बीच दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालला आहे. विशेष म्हणजे, येथे पर्यटकांना धोक्याची पूर्वकल्पना देण्यासाठी कोणतेही धोक्याचे फलक लावण्यात आलेले नाहीत, तसेच प्रशासनाकडून अधिकृत सुरक्षा रक्षक किंवा जीवरक्षक तैनात करण्यात आलेले नाहीत.
स्थानिक नागरिक आणि पोलीस मित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून, कोणतीही आधुनिक साधने किंवा विशेष प्रशिक्षण नसताना हे बचावकार्य करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पिरवाडी बीचवर कायमस्वरूपी जीवरक्षक आणि सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
वारंवार घटना
पिरवाडी येथे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक जीवरक्षकांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात अशा प्रकारे पाण्यात अडकलेल्या १० ते १२ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. कालही काही पर्यटक अडकले होते, त्यांनाही स्थानिक तरुणांनी बाहेर काढले.