Unseasonal Rain Crop Damage Pudhari
रायगड

Unseasonal Rain Crop Damage: पेणमध्ये अवकाळीतील आंबा-काजूच्या बागांचे पंचनामे पूर्णत्वास; 500 हेक्टरमधील 1140 शेतकऱ्यांचे नुकसान

निधीची प्रतीक्षा; कृषी विभागाकडून अहवाल सादर

पुढारी वृत्तसेवा

पेण शहर: एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विशेष करून पेण तालुक्यातील आंबा आणि काजूच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकताच आलेला मोहोर गळून गेल्याने हे पिक घेणारे शेतकरी हवालदिल झाले होते.

मात्र राज्य सरकारने झालेल्या अवकाळी पावसाची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत, तातडीने महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून या आंबा आणि काजू उत्पादकांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर झालेल्या पंचनाम्यांचा आढावा आणि अपेक्षित निधीबाबत कृषी विभागाने निधी मंजूर होण्यासाठी आपला प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवला आहे.

पेण तालुक्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विशेष करून हंगामानुसार आंबा आणि काजूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले 101 बाधित गावे असून आंबा उत्पादनाच्या 500 हेक्टर तर काजू उत्पादनाच्या 8 हेक्टर आणि इतर अशा जवळपास 1140 शेतकऱ्यांच्या 115 हेक्टर जमिनीतील फळबागांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील 115 हेक्टर जमिनीतील नुकसान भरपाई साठी जवळपास शासनाच्या हेक्टरी 22 हजार 500 या दरानुसार 1140 शेतकऱ्यांना जवळपास 1 कोटी 17 लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल आणि त्यासाठी अपेक्षित असलेल्या निधी बाबत पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे.

मदतीची प्रतीक्षाच

एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडला. यामध्ये तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, मात्र एप्रिल महिन संपून आता मे महिना देखील संपत आला तरी शासनाकडून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक रुपया देखील मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेअवकाळी पाऊस होऊन गेल्यानंतर आता मान्सून जवळ आला. आतातरी आम्हाला भातशेती करण्यासाठी लागणारी खते घेण्यासाठी तरी हात पैसे मिळावेत आणि ते पैसे कधी मिळतील या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

पेण तालुक्यात एप्रिल मध्ये झालेल्या पावसात अनेक आंबा आणि काजू विक्रेते शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेनंतर करण्यात आलेल्या 101 गावातील 1140 शेतकऱ्यांच्या 515 हेक्टर जमिनीच्या पंचनाम्यांचा अहवाल आम्ही जिल्हा स्तरावर पाठवला आहे. यासाठी किमान 1 कोटी 17 लाख रुपये आवश्यक आहेत. तो निधी लवकरात लवकर मिळेल याची खात्री आहे.
- सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी, पेण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT