पनवेल : तालुक्यातील वाघाची वाडी येथील नदीपात्रात पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन तरुण संकटात सापडले. या दुर्दैवी घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. सुमित यशवंत पवार (वय २६, रा. विचुंबे) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर नयन म्हात्रे (रा. विचुंबे) हा तरुण वाहून गेला आहे.
नेमकी घटना काय?
५ जुलै रोजी सुमित पवार, नयन म्हात्रे आणि त्यांचे आठ मित्र फिरण्यासाठी धोदाणी गावाजवळील वाघाची वाडी येथील नदीपात्रात गेले होते. यावेळी सुमित आणि नयन नदीत पोहण्यासाठी उतरले असता, नयन म्हात्रे पाण्याच्या प्रवाहातील एका भवऱ्यात अडकला. त्याला वाचवण्यासाठी सुमित पवार पुढे गेला, परंतु तोदेखील भवऱ्याच्या विळख्यात सापडला.
पाण्याला प्रचंड वेग
मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याचा वेग प्रचंड होता. या प्रवाहात नयन म्हात्रे वाहून गेला. त्यानंतर उपस्थित मित्रांनी जिद्दीने नदीपात्रात उतरून सुमित पवार याला बाहेर काढले. मात्र, नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला त्वरित खासगी वाहनाने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शोध मोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंदा कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदा हरगुडे, सुभाष डीगे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता नयन म्हात्रे याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिक प्रयत्न करत होते. या घटनेमुळे विचुंबे परिसरात शोककळा पसरली आहे.