पनवेल : विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिकेच्या 2026 च्या सार्वत्रिक निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांपुरती मर्यादित न राहता राजकीय समीकरणे, बंडखोरी, बिनविरोध निवडी आणि गंभीर आरोपांमुळे अधिकच तापली आहे. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून, 16 जानेवारीला मतमोजणी होईल. एकूण 20 प्रभागांमध्ये 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. काही प्रभागांत तीन तर काही प्रभागांत चार सदस्य निवडले जाणार असून, सुमारे 286 उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे. तब्बल सहा जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामध्ये नितीन पाटील (प्रभाग 18 ब), रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शना भोईर आणि प्रियंका कांडपिळे, ममता म्हात्रे यांचा समावेश आहे. प्रचाराचा एकही फेरी न फिरवता मिळालेल्या या यशामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र एका ठिकाणी भाजपला अनपेक्षित धक्का बसल्याचीही चर्चा आहे. स्नेहा शेंडे यांनी माघार घेतल्यामुळे एका अपक्ष उमेदवाराचा बिनविरोध विजय झाल्याचे समोर आले असून, ही अपक्ष उमेदवार भाजपचे विधानपरिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांची सख्खी बहीण आहे.
पनवेलमधील राजकीय लढतींचे चित्र पाहिले असता महायुती, म्हणजेच भाजप आणि शिंदे गट, यांनी शहरात पूर्ण ताकद लावली आहे. रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रभागनिहाय रणनीती आखत प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. विशेषतः नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली आणि कामोठे भागात भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मात्र खारघर परिसरात भाजपला बंडखोरीचा फटका बसलेला दिसतो. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अर्ज भरल्यामुळे निलेश बाविस्कर, गीता चौधरी आणि कोमल शिंदे-दहाडे या तीन बंडखोरांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईनंतरही स्थानिक पातळीवर असंतोष कमी झालेला नसल्याचे चित्र असून, याचा थेट परिणाम काही प्रभागांतील मतविभाजनावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. त्या सोबत खारघर शहरातील खारघर कॉलनी फोरम चे विशेष महत्व या निवडणुकीत दिसून येणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने शेवटच्या टप्प्यात का होईना, पण जागावाटपाचा तिढा सोडवत एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी एकत्र येत थेट महायुतीसमोर आव्हान उभे केले आहे.
या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांइतकेच काही गंभीर वादही केंद्रस्थानी राहिले आहेत. पनवेलमध्ये सुमारे पंचवीस हजारांहून अधिक बोगस किंवा दुबार मतदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, एकाच व्यक्तीचे नाव अनेक प्रभागांत असणे किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे नावे नोंदवण्यात आल्याचे दावे करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेत न्यायालयात दाद मागितली होती. मात्र वेळेअभावी न्यायालयाने निवडणूक थांबवण्यास नकार दिल्याने, हा मुद्दा आता थेट मतदानाच्या दिवशी मतदारांच्या मनावर परिणाम करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा एकही विद्यमान नगरसेवक नसतानाही त्यांना सन्मानजनक जागा देण्यात आल्याने, ही आघाडी भविष्यासाठी संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढवत असल्याचे मानले जात आहे. प्रभाग 1,2 आणि 3 प्रभागांत मविआच्या उमेदवारांना स्थानिक कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे काही ठिकाणी अटीतटीची लढत होणार असल्याचे संकेत आहेत.