खांदा कॉलनी: पनवेल परिसरात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना करंजाडे-पनवेलमधील रहिवाशांना मात्र पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. सिडको प्रशासनाकडून आठवड्यातून केवळ दोन-तीन वेळा आणि तेही मर्यादित स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
करंजाडे परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने रहिवाशांना खासगी टँकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. पावसाळ्यातही पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने सोसायटीधारकांवर आर्थिक भार वाढला आहे.
त्यातच पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाणी खरेदी करण्याचा अतिरिक्त खर्चही नागरिकांना सहन करावा लागत आहे. ‘एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे पाण्याची टंचाई’ अशी विसंगत परिस्थिती करंजाडे परिसरात निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
पाणीटंचाईमुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून कारंजाडे-पनवेल विरुद्ध सिडको असा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासनाने तातडीने तोडगा न काढल्यास रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता आहे.