विक्रम बाबर
पनवेल : शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीच्या मागील बाजूस भूखंड क्रमांक ५३८ वर असलेल्या कातकरी आदिवासी वाडीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीही योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण वाडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे तब्बल ३६ घरे पाण्याखाली गेली असून अनेक कातकरी आदिवासी कुटुंबांच्या घरातही पाणी शिरल्याने त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे वाडीत गुडघाभर पाणी साचले असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून साचलेल्या पाण्यामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच काही आजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे
स्थानिक आदिवासी बांधवांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसामुळे एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही पनवेल महानगरपालिकेचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी या वाडीत पाहणीसाठी किंवा मदतीसाठी फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच बाधित कुटुंबांना आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या वाडीत पाणी साचण्याची समस्या उद्भवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या मात्र प्रशासनाने तातडीने दखल घेऊन साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि बाधित कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
याच वाडीत एप्रिल महिन्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वूईके यांनी भेट देऊन, या ३६ कुटुंबाचे पुनर्वसन यांचं ठिकाणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यावेळी पनवेलचे प्रांत पवन चांडक , पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मेघमाळे आणि महापौर नितीन पाटील उपस्थित होते. यावेळी या वाडीची पाहणी करताना पिढ्यापिढ्या यां ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांना त्याच्या मालमत्तेचा अधिकार मिळाला पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली होती. मंत्र्यांनी पाठ फिरवल्यानंतर या वाडीच्या पुनर्वसनाचा मुद्दा अधांतरी राहिला आहे.