विक्रम बाबर
पनवेल: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने बुधवारी पनवेलहून मुंबईतील विधिमंडळावर काढण्यात येणारा पायी दिंडी मोर्चा पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला. आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये घोषणाबाजी, शाब्दिक बाचाबाची तसेच किरकोळ झटापट झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोण बोलत देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, अश्या घोषणेने परिसर दुमदुमला होता.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सकाळी आंदोलनकर्ते पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुंबईकडे पायी मोर्चा काढण्याची तयारी सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला.
परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळ घोषणाबाजी सुरू राहिली. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांची नंतर सुटका करण्यात आली.
मात्र पनवेलमध्ये काही नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केल्या नंतर काही प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी पनवेल मधून पायी चालत सायन पनवेल महामार्गा वरून कामोठे गाठले तर काही आंदोलनकर्ते थेट सानपाडा येथे पोचले.
मात्र पोलिसांनी सुरू ठेवलेल्या अटक सत्रा नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आणि या नामकरण आंदोलना साली पुढील नियोजित बैठक २० तारखेला घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी घोषणा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केल्या नंतर हे आंदोलन शांत झाले.
या आंदोलनात खा. बाळा मामा म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बबनदादा पाटील, ज्येष्ठ समाजसेवक कांतिलाल कडू, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, सखाराम पाटील, प्रकल्पग्रस्त, स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते.
काही काळ तणावाचे वातावरण
आंदोलनकर्त्यांनी विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली. यावेळी पोलिसांबरोबर किरकोळ झटापट झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवत पोलिसांनी मोर्चा पुढे जाण्यापासून रोखला आणि ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना काही वेळाने सोडून दिले.