Mumbai Pune Expressway Pudhari
रायगड

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघातानंतर मोठा निर्णय; बोरघाटात कायमस्वरूपी मदत केंद्र उभारणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यसभेत माहिती; रस्ता सुरक्षा उत्कृष्टता केंद्र व एटीएमएस प्रणालीद्वारे अपघात रोखण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जयंत धुळप

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर गेल्या 3 फेब्रुवारी रोजी प्रोपेलीन गॅस टँकर उलटला आणि तब्बल 32 तास दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. जवळपास 30 ते 35 किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आणि रस्त्यावर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याची दखल थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालायाला घ्यावी लागली.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात रोखण्याकरिती रस्ता सुरक्षा उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेची सर्वोत्तम पद्धती अंमलात आणण्याते येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी बोरघाटात मदत केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या (एचएसपी) बैठकीत निर्णय घेवून त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासकीय व्यवस्थापनातील अभाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना ‌‘एमएसआरडीसी‌’ आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिल्या . ‌‘एमएसआरडीसी‌’ आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या बैठकीत बोरघाट येथे कायमस्वरूपी मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बोरघाट परिसर हा खंडाळा-खोपोली दरम्यान सुमारे 18 ते 20 किलोमीटर लांबीचा आहे. या मदत केंद्रात अवजड वाहने स्थलांतरित करण्यासाठी ‌‘क्रेन‌’, अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणा, रुग्णवाहिका, गस्तीसाठी वाहने, पाण्याचा टँकर, कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या केंद्रामुळे बोरघाटामध्ये 3 फेब्रुवारीसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी तातडीने उपाययोजना करता येणार आहे.

दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहिती नुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने देशात रस्ते सुरक्षेच्या सर्वोत्तम पद्धती अंमलात आणण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास येथे रस्ता सुरक्षा उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व कामे भारतीय रस्ते काँग्रेस (आयआरसी) यांच्या मानके, मार्गदर्शक तत्त्वे, नियमावली, कार्यपद्धती संहिता तसेच रस्ते आणि पूल बांधकामांसाठीच्या वैशिष्ट्यांनुसार केली जातात. हे तपशील आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारावर तयार करण्यात आले आहेत.

अँटी-लॉक ब्रेकिंगसह ब्रेकिंग सिस्टीमची तरतूद

राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते सुरक्षा सुधारण्याच्या आणि अपघात कमी करण्याच्या उद्देशाने प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (एटीएमएस) तैनात करण्याची योजना आहे. एटीएमएस अंतर्गत इलेक्ट्रॉनिक देखरेख, अंमलबजावणी, घटनांची लवकर ओळख आणि प्रत्यक्ष क्षेत्रात तत्काळ प्रतिसाद देणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ घटना शोध आणि अंमलबजावणी प्रणाली (व्हीआयडीईएस), स्वयंचलित नंबर प्लेट ओळख (एएनपीआर) कॅमेरे, पॅन टू झूम (पीटीझेड) कॅमेरे आणि पाळत ठेवणारे कॅमेरे यांचा समावेश आहे. वाहने अधिक सुरक्षित करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मध्यम आणि अवजड वाहनांसाठी सक्रिय सुरक्षा वैशिष्ट्यांबाबत नियम प्रकाशित करण्यात आले असून त्या अंतर्गत अँटी-लॉक ब्रेकिंगसह ब्रेकिंग सिस्टीमची तरतूद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT