Mumbai Goa highway traffic update
खांब, श्याम लोखंडे : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्याला गेली तीन-चार दिवस मुसळधार पावसाने झोडपले असून, दोन दिवस मोठ्या प्रमाणात सगळीकडे पाऊस पडत आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गालगत सुकेळी खिंड आणि मोठ्या डोंगर घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडत असल्याने सारे वाहणारे नाले तुडुंब भरले आहेत. मुख्य महामार्गावर पाणी आल्याने नागोठणे-कोलाड मार्गावरील सुकेळी व महाराष्ट्र सीमलेस (जिंदाल) कंपनीजवळ मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण झाली. पहाटे चार वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी झाली असून, वाहतूक कोंडी सोडवताना नागोठणे आणि कोलाड पोलीस कमालीचे हैराण झाले.
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच पर्जन्यवृष्टी व पूरपरिस्थितीत कोणी वाहने हाकू नयेत यासाठी आणि कोंडी नियंत्रित करण्यासाठी नागोठणे व कोलाड पोलीस यंत्रणा कार्यरत झाली असून त्यांची देखील मोठी दमछाक होत असल्याचे दिसून येत होते. अखेर पोलिसांनी यावर मार्ग काढत सीमलेस आणि जिंदाल या कंपनीच्या आतून वाहने काढून वाहतूक कोंडी सोडवली.महाराष्ट्र सीमलेस (जिंदाल) कंपनीने पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यावर भलीमोठी जाळी लावली असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर मार्गावर पाणी साचत आहे. या पाण्यामुळे जवळपास पहाटे चार वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली होती. प्रवासी देखील खोळंबल्याचे सुकेळी गावातील नागरिक सतीश सुटे यांनी सांगितले.
या सततच्या पावसाचा परिणाम मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे परिसरातील आणि डोंगर भागातील पाणी खालील काळू आणि आंबा नदीच्या पातळीत जाते. मात्र, गेली चार दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाने या मार्गावर पाणी साचून राहिले असल्याचे दिसून येत आहे.
सुकेळी परिसरात कारखानदारी वाढत आहे, त्याचे भराव आणि पाणी वाहून जाणारा नाला यावर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. सुकेळी गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने याचा मोठा फटका वाहतुकीला बसला आणि किमान पाच ते सहा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली.निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडवताना नागोठणे आणि कोलाड पोलीस कमालीचे हैराण झाले होते. मात्र, भर पावसात देखील सावधगिरी बाळगून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करत असताना दिसून येत होते.