कोलाड ः मुंबई-गोवा महामार्ग हा वाहतुकीच्या व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग असुन या महामार्गाच्या दुतर्फे लहान-मोठी वृक्ष होती.ती चौपदरीकरणाच्या कामात तोडण्यात आली यामुळे प्रवाशांसहित, शेतकरी,वाटसरू यांना असणाऱ्या सावलीचा आधार तुटला.शिवाय मुंबई-पुणे येथून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही क्षणभर विश्रांतीसाठी वृक्षवल्ली उपयुक्त ठरत होती. परंतु सध्यास्थितीत तापमानाचा पारा चढल्यामुळे आजूबाजूला थोडयाप्रमाणात असणारी झाडे ही करपून गेली आहेत. यामुळे प्रवाश्यांना मिळणारी सावली हरपली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
महामार्गावर दोन्ही बाजूला असंख्य झाडे होती ती महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तोडण्यात आली.व त्याची विक्री करून लाखो रुपये लाटण्यात आले. परंतु तेव्हा रस्त्याचा सर्व्हे करून त्या पैशात तोडलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावण्यात आली असती तर गेली 17 वर्षात ती झाडे मोठी झाली असती व प्रवाशांसहित वाटसरू, शेतकरी यांना सावलीचा आधार झाला असता.
महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम 2026 पर्यंत पूर्ण होईल हे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची लागवड करावी. याबरोबर लागवड केलेली झाडे जगविण्यासाठी प्रयत्न करावी यामुळे या मार्गांवरील वृक्षवल्ली पुन्हा बरसेल व पर्यावरणात होणारा बदल ही थांबेल असे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
वृक्षतोड, वणव्यांना परिसर ओसाड
चौपदरीकरणासाठी केलेली वृक्षतोड व आजूबाजूच्या जंगलांना लावण्यात येणारे वणवे यामुळे सर्व परिसर ओसाड पडला आहे. दिवसेंदिवस तापमानात बदल होत चालला असून याचा प्रत्यय दोन वर्षांपूर्वी आला आहे. कारण दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील भिरा येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद झाली होती.