Mumbai Goa Highway Pudhari
रायगड

Mumbai Goa Highway: महामार्ग अजूनही अपूर्णच; जनतेचा आक्रोश सुरू

मुंबई-गोवा महामार्गाचे रडगाणे संपणार कधी?; ठिकठिकाणी नागरिकांची आंदोलने

पुढारी वृत्तसेवा

कमलेश ठाकूर

पेण: मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली सतरा वर्ष सुरू आहे मात्र मे 2026 च्या अखेरीस हे काम किमान पूर्ण होईल अशा प्रकारची खात्री सरकारने दिली होती. मात्र मे महिना संपून आता जून महिना ही सुरू झाला तरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही सुरू आहे. एकीकडे टोल वसुली सुरू करण्यात आली असताना मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित करीत नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

रायगड जिल्ह्यात पेण व रोहा तालुक्यात अनेक ब्रिजची कामे अजूनही अपूर्ण आहेत, तर इंदापूर- माणगाव येथे बायपास करण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे, हे काम पूर्ण होण्यास पुढील सहा महिन्याचा कालावधीही लागेल आणि या ठिकाणी दररोजची वाहतूक कोंडी होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही हीच अवस्था आहे, तर सर्वच ठिकाणचे सर्विस रस्ते, रस्त्यावरील विजेची व्यवस्था, हायवेवरील तोडण्यात आलेले वृक्ष, पुन्हा नव्याने कराववयाची वृक्ष लागवड यासारख्या अनेक सुविधा अजूनही केलेल्या नसल्यामुळे व अजून किमान सहा महिने हे काम चालू राहणार असल्याचे दिसते.

याशिवाय रायगड जिल्ह्यातील पेण आणि पनवेल तालुक्याच्या मधोमध खारपाडा येथे गेले महिन्याभरापासून टोल नाका मात्र सुरू करण्यात आला आहे आणि या ठिकाणी सर्व वाहनाकडून टोल वसुली मात्र सुरू करण्यात आली आहे. हा टोल अन्यायकारक आहे. किमान पहिल्यांदा महामार्ग सुरळीत करा, रस्त्याची सर्व कामे पूर्ण करा अशा मागण्या घेऊन रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलने केली.

रायगड जिल्ह्यातील विविध संस्थांनी आंदोलने केली. याशिवाय जन आक्रोश समितीनेही सलग दहा ते पंधरा दिवस आंदोलने सुरू ठेवली आहेत. तरीही टोल नाका मात्र सुरूच ठेवण्यात आला आहे. यामुळे या टोल मार्गाच्या विरोधात जनतेने आपला आक्रोशहीं सुरू ठेवला आहे. अशी स्थिती सर्वच ठिकाणी पाहायला मिळत आहे.

माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. कोलाड येथील पूलांचे कामे अद्याप पूर्ण झालेले नाही. वडखळ, नागोठणे, कोलाड येथील सर्विस रोडची कामेही अपूर्ण आहेत.

महामार्गाचे काम पंधरा वर्ष रखडल्याने कोकणचे आतोनात नुकसान झाले आहे. सद्यस्थिती लक्षात घेतली तर उर्वरीत कामे अजून वर्षभर पूर्ण होतील अशी चिन्ह नाहीत. त्यामुळे जोवर संपुर्ण महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. तोवर टोल वसूली करू नये, आणि कोकणवासीयांना टोल वसूलीतून सूट द्यावी, अशी मागणी कोकण भूमी प्रतिष्ठाने कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी केली आहे.

महामार्गाच्या कामाची रखडपट्टी सुरूच

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला २०११ साली सुरूवात झाली होती. . मात्र २०२६ उजाडले तरी महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. दरवर्षी मे अखेर नाहीतर डिसेंबर अखेरपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी आश्वासने दिली जातात. मात्र रस्त्याचे काम काही पूर्ण होत नाही. न्यायालयातही दाखल याचिकांवर सुनावणी दरम्यान महामार्ग विभागाने या रस्त्याच्या कामा संदर्भात अनेक लेखी तारखांची हमीपत्र दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT