पोलादपूर ः मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भोगाव गावचे हद्दीत खचलेल्या रस्त्यावर केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने चालक बचावला आहे.
चालक अंकित राजेश कुमार यादव , उत्तर प्रदेश हा आपल्या ताब्यातील टँकर (जी जे 13 बी डब्ल्यू 3544) घेऊन लोटे ते दौंड पुणे असा जात होता. कशेडी घाटात भोगाव हद्दीत आला असता महामार्गावरील सुमारे 90 ते 120 फूट लांब व चार फूट खोल खचलेल्या रस्त्यावर रस्त्याचा अंदाज न आल्याने पलटी होऊन महामार्गावर असणार्या मातीच्या ढिगार्यात अडकला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने चालकाला किरकोळ दुखापत वगळता चालक बालबाल बचावला आहे. टँकरमध्ये वाहनांचे सीट कव्हर बनविणारे फोम केमिकल असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
या घटनेची माहिती समजतात कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पीएसआय समेळ सुर्वे, पोलीस हवलदार शंकर कुंभार, श्री रामागडे, श्री चिकणे यांनी तातडीने धाव घेत मदत कार्य करून एकेरी वाहतूक सुरू ठेवली.
महामार्गावरील कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो या मार्गावरून मुंबई ,पुणे व तळ कोकणात जाणार्या येणार्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते मात्र असे असतानाही भोगाव गावच्या हद्दीत सुमारे 90 ते 120 फूट लांब रस्ता प्रति वर्षाप्रमाणे यंदाही सुमारे 4 फूट खोल खचला आहे या मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात मात्र ठोस उपाययोजना होत नसल्याने रस्ता खचण्याची सातत्य कायम राहिले आहे खचलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने नादुरुस्त होण्याच्या व अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी जनता आणि वाहन चालकांतून केला जातो.
यासह धामणदेवी ते कशेडी बंगला या सहा किलोमीटर अंतरापर्यंत महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून महामार्गाची चाळण झाली आहे. येणार्या गौरी गणपती सनापूर्वी तरी या रस्त्याची डागडूजी करून महामार्ग वाहतुकीसाठी आणि गणेश भक्तांसाठी सुरळीत करावा अशी माफक अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.