उरण : मोरा ते भाऊचा धक्का (मुंबई) या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतुकीच्या तिकीट दरात मंगळवार, 26 मे पासून 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळी हंगामाचे कारण देत ही दरवाढ करण्यात आल्याने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने या पावसाळी हंगामासाठी नवीन तिकीट दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, प्रौढांच्या पूर्ण तिकिटाचे दर 80 रुपयांवरून थेट 105 रुपये करण्यात आले आहेत, म्हणजेच यामध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. तर लहान मुलांच्या (हाफ तिकीट) दरात 39 रुपयांवरून 53 रुपयांपर्यंत म्हणजेच 14 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही नवीन दरवाढ 26 मे पासून ते 31 ऑगस्टपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षकांनी दिली आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामाचे कारण पुढे करून या मार्गावर 20 ते 25 रुपयांची दरवाढ केली जाते. मात्र, पावसाळा संपल्यानंतर उन्हाळी हंगामातही ही वाढलेली किंमत कमी केली जात नाही, ती तशीच कायम ठेवली जाते. त्यानंतर पुढच्या पावसाळ्यात पुन्हा त्यात नवीन दरवाढ केली जाते, असा प्रवाशांचा आरोप आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आणि सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सध्या पावसाळा तोंडावर आहे. त्या काळात अन्य जलवाहतूक सेवा बंद ठेवली जातात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मोरा ते भाऊचा धक्का ही जलसेवा मात्र पावसाळयातही सुरू ठेवली जाते.