रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतरही खाडीपट्टयात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जून महिन्याची 5 तारीख उलटली, तरी भात शेतीच्या पेरणीसाठी आवश्यक असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आकाशाकडे टक लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन लांबणीवर टाकावे लागत आहे.
खाडीपट्टयातील भात शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या पावसानंतर शेतकरी बांधावर येतात. नांगरट, वखरणी करून भाताच्या रोपांसाठी बीजप्रक्रिया केली जाते. मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतातील जमिनी अद्याप कोरड्या आहेत. नांगर तयार आहेत, बियाणे आणून ठेवले आहे, पण पावसाची प्रतीक्षा संपत नाहीये.
भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ढग येतात आणि निघून जातात, पण पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी साशंक आहेत. पेरणी लांबल्यास भाताची वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. कृषी तज्ञांच्या मते, भाताची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत झाली नाही, तर उत्पादनात 15 ते 20 टक्के घट येण्याची शक्यता असते.
खाडीपट्टयातील शेतकरी भात हेच मोठ्या प्रमाणात पिक घेतात. पावसाची एक तरी सर येऊन गेली तरी पेरणीसाठी ओलावा आवश्यक निर्माण होईल. पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचा धोका वाढतो आणि बियाणे, खत, औषधांवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. शेतकरी आता रोज सकाळी ढगांकडे पाहत आहेत.
“पहिला पाऊस झाला की आम्ही लगेच नांगराला जुतणार. रात्रीच बियाणे भिजवून ठेवू. पण पाऊसच नाही आला तर काय करणार? कर्ज काढून बियाणे आणले आहे,“ असा प्रश्न तेलंगे येथील शेतकरी महादेव राणे यांनी उपस्थित केला.