Monkeys Rush to Tehsildar's Office for Water; Deputy Tehsildar Gives Them a Drink
रोहे : महादेव सरसंबे
जंगल नष्ट होत आहे तर दुसरीकडे सूर्यनारायणाचा प्रकोप वाढत असल्याने रोह्यात पशुपक्षी, प्राणी पाण्यासाठी शहरी वस्तीकडे येताना दिसत आहेत. अशीच घटना मंगळवारी सकाळी रोहा तहसीलदार कार्यालय घडली. पाण्यासाठी चक्क माकडे तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार यांच्या दालनातील पाणी बॉटल घेताना दिसत होते. ही माकडांची धडपड बघून नायब तहसीलदार वैशाली काकडे भाबड यांनी या माकडांना ग्लास व पाण्याच्या बाटलीतून पाणी पाजले.
कामात व्यस्त असलेल्या अधिकारी नायब तहसीलदार वैशाली काकडे भाबड यांनी माकडांना पाणी देत प्राण्या प्रती प्रेमाची व आपुलकीची भावना व्यक्त केल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहत असताना त्यांच्या अस्तित्वाची जागा असलेले जंगल नष्ट होत असल्यामुळे त्यांना अन्नासाठी व पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे दिसून आले.
रोहा तालुका हा चहुबाजूनी डोंगरदर्याने वेढलेला आहे. पूर्वी हा डोंगर घनदाट झाडांनी वेढलेला असत. या जंगलात ससा, रानडुक्कर, भेकर, रानमांजर, माकडे, मोर असे अनेक पक्षी, प्राणी आढळून येत असत. परंतु सातत्याने वृक्षतोड होत असल्याने हे जंगल आता बकाल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्राण्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्न निर्माण झाला आहे. आता हे प्राणी नागरी वस्तीकडे अन्न व पाण्यासाठी वळू लागले आहेत. रोहा शहरात सातत्याने मोठ्या प्रमाणात माकडे येताना दिसतात. ठिकठिकाणी विविध इमारतीमधून, घरावर हे माकडे अन्नाच्या शोधात फिरताना दिसत आहेत.
रोहा नागोठणा मार्गावरील भिसेखिंडे येथे मोठ्या प्रमाणात माकडे रस्त्यावर येताना दिसतात. या मार्गावरून येणारे व जाणारे प्रवासी, वाहन चालक त्यांना अन्न व पाणी देताना दिसतात. भिसेखिंडे येथे काही प्राणी प्रेमी माकडांसाठी फळे व पाणी नित्यनेमाने घेऊन जाताना दिसत असतात. या मार्गावर रस्त्याच्या साईडला असलेल्या कट्यावर केळी, फळे व ड्रम मध्ये पाणी ठेवत असतात.
यावर्षी उन्हाचा तडाका वाढल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे रानातील माकडे व पशु, प्राणी पाण्यासाठी शहराकडे व मानवी वस्तीकडे येताना दिसत आहेत. शासनाच्या वनखात्याकडे अनेक योजना दरवर्षी राबवल्या जातात. अशा योजना राबवत असताना त्याची प्रगती किती झाली हे कुठे दिसत नाही. वने मात्र बकाल होताना दिसत आहेत. दुसरीकडे तौक्ते चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळावेळी मोठ्या प्रमाणात जंगलातील झाडे उन्मळून पडली ती झाडे कुठे गेली. नवीन किती झाडे लावली हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.