रायगड: कोविड 19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ बालकांना तसेच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मिशन वात्सल्य योजना यशस्वीपणे राबविली होती. या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा, एकल, परित्यक्त्या महिलांना 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेनुसार या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
कोविड काळात सुरू केलेल्या मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. अनाथ मुले, विधवा व एकल महिलांना शासकीय कागदपत्रे व त्यांना लागू होणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुलांना शासकीय मदत, मृत्यू दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, विधवा पेन्शन, रेशनकार्ड, निवारा व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, अत्यावश्यक कागदपत्रे शिबीरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
आता याच योजनेत सर्व विधवा महिलांचा समोवश करण्यात आला असून, जिल्हास्तरावर विविध शिबिरे व मेळावे आयोजित करून समितीच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सर्व एकल महिलांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
“कोविड काळात सुरू झालेली मिशन वात्सल्य योजना अधिक विस्तार करण्याच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व विधवा, एकल व परित्यक्त्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.”-आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री