महाड: महाड शहरावर निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी आज प्रत्यक्ष तालुक्यातील नडगाव जवळ असलेल्या जलस्रोताची प्रत्यक्ष पाहणी केली.
त्या ठिकाणी असलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग महाड शहरातील टंचाईग्रस्त भागाला करण्यात यावा यासाठी पर्यायी व्यवस्था तातडीने करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश ना. भरत गोगावले यांनी दिले. शहरातील पाणीटंचाई वर तातडीने उपाययोजना करण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी वरील आदेश दिले.
महाड शहराच्या बहुतांश भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे कोथुर्डे धरणातील पाण्याची पातळी पूर्णपणे खालावल्याने त्या धरणातून पाणीपुरवठा बंद झाला आहे. महा शहराला गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर ना. भरतशेठ गोगावले यांनी नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील दगडखाण उत्खननामुळे निर्माण झालेल्या तीन मोठ्या जलसाठ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या जलस्रोतां मधील उपलब्ध पाणी महाड शहरातील करंजखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात यावी याची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यानंतर महाड नगर परिषद कार्यालयात पाणीटंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी विविध पर्यायी जलस्रोतांचा वापर, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, आवश्यक यांत्रिक सुविधा तसेच जलसाठ्यांचे प्रभावी व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ना. भरतशेठ गोगावले यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी महाड शहराचे नगराध्यक्ष मा. सुनील कविस्कर, महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. कोळेकर, विविध विभागांचे अभियंते व कर्मचारी, रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, गटनेते ॲड. निखिल शिंदे, संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, माजी नगरसेवक सुनील अगरवाल, बांधकाम सभापती सुमित पवार, आरोग्य सभापती महेश शेडगे, नगरसेवक प्रमोद महाडिक, विद्या देसाई, दीपक चव्हाण, सनी जाधव, गोळे, गायत्री कविस्कर, मीनल जाधव, रणजित साळी, नितीन आर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होणारनाही
महाडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ दिली जाणार नाही. प्रशासनाने समन्वयाने काम करत उपलब्ध सर्व पर्यायांचा वापर करून अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.