Mhasla Nagar Panchayat election Pudhari
रायगड

Raigad political news: म्हसळा नगराध्यक्षपदाची 7 मे ला निवडणूक; नगरसेवकांमधूनच होणार निवड

17 पैकी 10 सदस्यांनाच हक्क ,7 नगरसेवक अपात्र

पुढारी वृत्तसेवा

म्हसळा: म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक 7 मे रोजी होणारआहे. तसा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेला आहे. नगरपंचायतीमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींमुळे ही निवडणूक होणार आहे.

सभागृहाच्या 17 सदस्यांपैकी केवळ 10 नगरसेवकांनाच मतदानाचा अधिकार असून, 7 जणांना पक्षांतर कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यावरही सोमवारीच सुनावणी होणार आहे. विद्यमान नगरपंचायतीची मुदत फेब्रुवारी 2027 पर्यंत असल्याने या काळात नगराध्यक्षपदी कोण विराजमान होते याबाबत राजकीय वर्तुळातउत्सुकता लागलेली आहे.

म्हसळा नगरपंचायतीची निवडणूक फेब्रुवारी 2021 मध्ये घेण्यात आली होती. त्यावेळी नगराध्यक्षपदाची निवड ही थेटऐवजी नगरसेवकांमधूनच करण्याचा नियम तत्कालीन राज्यसरकारने केला होता. त्यानुसार ही निवडणूकघेण्यात आली होती.

यामध्ये एकत्रित राष्ट्रवादीने 13 जागा जिंकत निर्विवादपणे वर्चस्व मिळविले तर काँग्रेसने 2, शिवसेना 2 असे सदस्य विजयी झालेले होते. त्यावेळी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे संजय कर्णिक तर उपनगराघ्यक्षपदी संजय दिवेकर यांची नगरसेवकांमधून निवड करण्यात आली.

त्यानंतर नगराध्यक्ष संजय कर्णिक आणि उपनगराध्यक्ष संजय दिवेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी फरीन अ. अजीज बशारत तर उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अनिकेत पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याच दरम्यान,राज्यात अनेक राजकीयघडामोडी घडत राहिल्या. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या राजकीय फुटीचे परिणाम म्हसळा येथेही उमटले.खा. सुनील तटकरे आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी एकमेकांना शह, काटशह देण्यासाठी मोठ्या राजकीयखेळी केल्या.

यामधून म्हसळा नगरपंचायतीमध्ये फूट पाडून मंत्री भरत गोगावले यांनी नगराध्यक्ष फरीन अ. अजीज बशारत, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसर यांच्यासह सात नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला.

यामुळे म्हसळा नगरपंचायतीमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टातआली. याला प्रत्युत्तर म्हणून खा. सुनील तटकरे यांनी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षांसह फुटलेल्या सात नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्रठरवावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल केले. त्या अपिलावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या सातही जणांनाअपात्रठरविले.

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला शिवसेनेच्या सातही नगरसेवकांनी आव्हान दिलेलेआहे. विद्यमान 10 नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीचे 6, ठाकरेशिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे नगरसेवक आहेत. त्यामुळेसोमवारी होण़ाऱ्या सुनावणीत काय निर्णय लागतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.

अपात्र नगरसेवकांच्या अर्जावर आजच सुनावणी

जिल्हा प्रशासनाकडे नगरसेवक पद रद्द बातल ठरल्याने सदस्यांनी राज्याच्या नगर विकास कार्यालयाकडे अपील दाखल करून दाद मागितली आहे. सदरचे खाते हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे.

या प्रकरणाची तातडीने सुनावणी सोमवारी 27 एप्रिलला होणार आहे. याच दिवशी नव्याने नगराध्यक्ष निवडणूक अर्ज दाखल करण्याचे दिवशी सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती नगर पंचायत प्रशासनाने दिली आहे.या प्रकरणाचा निकाल काय लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली असून नगराध्यक्षपदाचे नव्याने निवडणूक कार्यक्रमाची रंगत वाढणार असून राजकीय काय घडामोडी घडतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक कार्यक्रम

27 एप्रिल : सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेतउमेदवारी अर्ज

28 एप्रिलः दुपारी 2 नंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी

29 एप्रिल : फेटाळण्यात आलेल्या नामनिर्देशनांची यादी व कारणे सूचना फलकावर प्रसिद्ध करणे

30एप्रिल : अर्ज फेटाळल्यास त्याविरुद्ध अपिल करणे

4 मे : वैध उमेदवारांची नावे जाहीर करणे

5 मे : अर्ज माघारीचा अखेरचा दिवस

6 मे : अंतिम उमेदवारांच्या नावांची घोषणा

7 मे : मतदान,मतमोजणी

नगरपंचायतीमध्येउरलेल्या 10 नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केलेलाआहे. त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. नगराध्यक्षपदाची निवड ही नगरसेवकांमधूनच केली जाणार आहे.
- विठ्ठल राठोड, मुख्याधिकारी,म्हसळा नगरपंचायत
SCROLL FOR NEXT