माथेरान : मिलिंद कदम
माथेरानमध्ये ई-रिक्षा वाढीकरिता सुरू असलेल्या बेमुदत बंद आंदोलनाचा दुसरा दिवस असून शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे हे आंदोलन सुरू असून एकूण 22 उपोषणकर्ते यावेळी येथील श्रीराम मंदिर चौकामध्ये उपोषणास बसले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमधील 94 हा तर रिक्षा चालकांना त्यांच्या या गुलामगिरीच्या व्यवसायातून मुक्तता मिळावी याकरिता सहा महिन्यांचा अवधी देऊन पुनर्वसन व्हावे असा आदेश दिला होता. या आदेशाबरोबरच माथेरानमध्ये इतर गरजू लोकांनाही यामध्ये सामावून घ्यावे असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या हप्त्यामध्ये 20 जण ई रिक्षा चालवत आहे व त्यानंतर आणखी 20 जणांना सामावून घेण्याचे आदेश पारित झाले होते असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे परंतु राहिलेल्या 54 हात रिक्षाचालकांचे भवितव्य काय त्यांचा विचार होणार का यासारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर मिळत नसल्याने या हात रिक्षा चालकांनी माथेरानमध्ये यापूर्वीही रिक्षा बंदची हत्यार उपासले होते परंतु त्यास शासनामार्फत खोटीच आश्वासने मिळाली असल्याची भावना या हात रिक्षा चालकांमध्ये प्रखर झाली आहे.
येथील श्रीराम चौकामध्ये या हात रिक्षा चालक मालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे परंतु या उपोषणाची दखल घेतली गेली नाही तर हे आंदोलन अधिक प्रखर करून पुढील काळामध्ये आत्मदहनाचा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.
माथेरान म्हणजे संघर्षाचे गाव हे गणित आता कायम रुजू झाले आहे. कोणत्याही मागण्या मिळवण्याकरिता माथेरानकरांना नेहमी संघर्ष करावा लागला आहे व तो संघर्ष शासकीय व पर्यावरणवादी यांच्याबरोबर अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे आताही सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही न्याय मिळत नसल्याने ई-रिक्षा चालकांनी आरपारची भूमिका घेतली आहे.