आनंद सकपाळ
नेरळ: ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेली 4 कोटी रुपयांची पाणी योजना गेल्या अडीच वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच रखडली आहे. त्यामुळे वाढत्या नागरीकरणामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांमधून प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ममदापूर ग्रामपंचायत ही नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. अनेक गृहप्रकल्प पूर्ण झाले असून, तेथे नागरिक वास्तव्यास देखील आले आहेत.
त्यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, जुन्या पाणी पुरवठा योजनेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. परिणामी अनेक भागांमध्ये केवळ 20 ते 30 मिनिटेच पाणीपुरवठा केला जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सन 2007 ते 2012 या कालावधीत असलेल्या सुमारे सात हजार लोकसंख्येच्या आधारावर मंजूर झालेली जुनी पाणी योजना ही अनेक वर्षे रखडली होती. ती योजना साधारणतः 2021-22 दरम्यान पूर्णत्वास गेल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर वाढलेल्या लोकसंख्येमुळे सद्यस्थितीत ती जुनी पाणी योजना ही अपुरी पडत आहे.
नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन स्तरावरून जलजीवन मिशन अंतर्गत 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या योजनेचे भूमिपूजन कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले होते. मात्र भूमिपूजनानंतर अडीच ते तीन वर्षांचा कालावधी उलटूनही पाण्याच्या टाकीचे बांधकाम तसेच पीव्हीसी पाइपलाइनचे काम अद्याप अर्धवट अवस्थेतच आहे.
विशेष म्हणजे संबंधित ठेकेदाराने सदर काम पूर्णपणे बंद केल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. या संदर्भात संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याचे कारण संबधित विभागाचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात काम बंदच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
सध्या जुन्या योजनेतून ममदापूर वाडी, मुस्लिम आळी, हिंदू आळी, बौद्ध वस्ती, आचानक नगर, शनि पॅलेस, कॉलेज रस्ता,गोकुळधाम सोसायटी आदी परिसरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र अपुरा आणि अल्प वेळेचा पाणीपुरवठा होत असल्याने, मोठया प्रमाणात टँकरने पाणी मागविण्याची वेळ नागरिकांनवर आली आहे. तर टँकरवाले ही उल्हास नदी पात्रात ज्या ठिकाणी नाल्यातून सांडपाण्याचा निचरा होत आहे. त्या ठिकाणावरून पाणी टँकरद्वारे उचलाकरून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा करीत आहे.
ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील वाढते गृहप्रकल्प व त्यामुळे झपाट्याने वाढत असलेले नागरीकरणामुळे जुनी पाणी योजना अपुरी पडत असल्याने, शासनाकडून जल जिवन मिशन योजने अंतर्गत 4 कोटीची पाणी योजना मंजूर लोकप्रतिनिधीच्या हस्ते एकीकडे उद्घाटन आणि भूमिपूजन मात्र तीन वर्ष उलटून देखील कामाचे स्वरूप अर्धवट स्थितीत तर ठेकेदाराला अधिकारी वर्गाकडून नोटीस सत्र सूरू मात्र कार्यवाही शुन्य स्थिती पहाता नागरिकांची होणारी गैरसोय पाहाता अशा ठेकेदार व अधिकाऱ्याचे कान हे उद्घाटन आणि भूमिपूजन करणाऱ्या लोकप्रतिनिधी पकडून जाब विचारावा व नागरिकांना होणाऱ्या गैरसोईचे निवारण करावे.- पुंडलिक शिनारे, माजी सरपंच ममदापूर ग्रा.पं.