रायगड : ऋषिता तावडे
महाराष्ट्रामध्ये अन्ने व औषध प्रशासनाने गेल्या तीन महिन्यात कारवाईचा वेग चार पटीने वाढवत राज्यातील १४०० हजार अन्न नमुने तपासून ७००० हजार नमुन्यांचे विश्लेषण करून निकृष्ट दर्जाचे नमुने सापडलेला ५००० हजार टन माल जप्त केला आहे. त्यामुळे एफडीए कारवाईचा तुकाराम मुंडे पॅटर्न तयार झाला आहे.
नामांकित हॉटेल आणि चवीचे ब्रॅन्ड शरीराला किती घातक आहेत याचा वस्तुपाठच समोर आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे मे महिन्यात रुजू झाले. त्यांच्या या दोन महिन्याच्या कारकिर्दीचा सुपरफास्ट नमुना आहे. एकेकाळी मुंबई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गो.रा. खैरनार यांनी बेकायदा बांधकामे जमीनदाेस्त करत कारवाईचा पॅटर्न तयार केला होता.
एफडीएच्या आयुक्त असलेल्या तुकाराम मुंडे यांनी अन्न नमुने तपासण्याचा वेग चौपटीने वाढवला आणि नाशवंत पदार्थ ते स्टींग पर्यंतचा कारवाईचा वेग वाढवत शाळा महाविद्यालयांपर्यंत सुरु असलेल्या नशिल्या कोल्ड्रीक्सना लगाम लावला. १३, ४७४ नमुने तपासणीला घेऊन ९४०३ नमुन्यांवर कारवाईचा धडाका लावला.
तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त पद स्विकारल्या नंतर प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ट्रॅकडाउन केली आहे. आतातर चायनिजवाला राईस प्लास्टिक नाही तर कंटेनरमध्ये पॅक करून देत आहे. अजून काय पाहिजे.
मुडेंचा सगळ्यात मोठा दणका कुठे बसलाय तो गुटखावाल्यांना, थेट टपर्या बंद झाल्या आहेत. राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. शाळांच्या ५०० मीटर परिसरामध्ये आता स्टिंग पेय विक्रीसाठी बंदी असणार आहे. स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. नियमात बसत असले तरी मुलांना याची सवय लागते.
रक्तपेढ्यांनी कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे
रक्ताची चोरी, रक्तसंकलन प्रक्रियेतील गैरव्यवहाराप्रकरणी मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या जेजे महानगर रक्तपेढीला अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए) सील केल्यानंतर आता बदलापूर येथील माया रक्तपेढीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जेजे महानगर रक्तपेढीमधून तसेच या रक्तपेढीच्या नावे घेतलेल्या शिबिरांमधून रक्ताची चोरी करून खासगी रक्तपेढीमध्ये नेले जात होते. अशा ५५ रक्ताच्या पिशव्यांची चोरी निदर्शनास आणून दिले.
औषधे व सौंदर्यप्रसाधने यांच्यासह रक्त ही जीवरक्षक बाब असून त्याचे संकलन, प्रक्रिया व वितरणामध्ये सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता, सुरक्षितता तसेच पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. रक्तदाता आणि रुग्णाच्या आरोग्याशी संबधित निष्काळजी अन्न व औषध प्रशासन सहन करणार नाही. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला आहे.