Rainwater Harvesting Project Pudhari
रायगड

Rainwater Harvesting Project: पाणीटंचाईवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प प्रभावी उपाय; शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा

जिल्हा गृहनिर्माण संस्था अध्यक्ष राजाराम पाटील

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: मागील दोन-तीन वर्षापासून महाड शहरासह तालुक्यात भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाड नगरपरिषदेने शहरांतील सुमारे 200 गृहनिर्माण संस्थांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत सहकार्य करावे अशी मागणी गृहनिर्माण सोसायटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजाराम पाटील यांनी नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

शहरावर ओढवलेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईने प्रशासन आणि नागरिक दोघांनाही धोक्याची घंटा दिली असून, या संकटावर मात करण्यासाठी आता केवळ तात्पुरत्या उपाययोजना नव्हे तर ठोस, शाश्वत आणि सक्तीच्या पावलांची गरज निर्माण झाली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांसह सर्व नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प तातडीने राबवणे बंधनकारक करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून, यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.

दरवर्षी मुसळधार पाऊस पडूनही शहरात पाण्याची टंचाई निर्माण होणे ही गंभीर व्यवस्थापनातील त्रुटी असल्याची कबुली प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाचे लाखो लिटर पाणी नाल्यांद्वारे वाहून जात असून त्याचे योग्य साठवण किंवा भूजल पुनर्भरण होत नसल्याने उन्हाळ्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. परिणामी, नागरिकांना महागड्या टँकरवर अवलंबून राहावे लागते, तर काही भागांत पाण्यासाठी नागरिकांना वाट बघत राहावे लागत असल्याचे दिसून आले आहे .

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील सर्व नव्या बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याचे धोरण अधिक कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ठराविक कालावधीत ही यंत्रणा बसवण्याबाबत निर्देश द्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

नगरपरिषद, जलसंपदा विभाग आणि संबंधित तांत्रिक यंत्रणांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी मार्गदर्शन, नकाशे आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष जनजागृती मोहीमेची मागणी केली आहे.

शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण कमी होवू शकतो

रेन वॉटर हार्वेस्टिंग ही केवळ पाणी साठवण्याची पद्धत नसून ती भूजल पातळी वाढवणारी आणि पर्यावरणीय संतुलन राखणारी प्रभावी यंत्रणा आहे. यामुळे विहिरी, बोअरवेल्स आणि जलस्रोतांना दीर्घकाळ पाणी उपलब्ध राहते, तसेच शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कार्या बरोबरच सामूहिक जबाबदारी, शासकीय योजनांचा प्रभावी वापर आणि तंत्रज्ञानाचा योग्य अवलंब केल्यासच महाड शहराला पाणीटंचाईच्या भीषण संकटातून दिलासा मिळू शकतो, असा विश्वास राजाराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT