Jetty Scam Pudhari
रायगड

Jetty Scam: महाराष्ट्र सागरी मंडळाचे वहुर जेट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे

सावित्री नदीच्या पाण्यात वाहून जाणार असल्याची धक्कादायक माहिती; अडीच कोटी रुपयांचा निधी जाणार वाया

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्णबाळ

महाड: महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे कुंड आहे या ठिकाणी जाण्यासाठी सावित्री नदीच्या पाण्यातून होडीतून जावे लागत असल्याने पर्यटकांसाठी जे टी बांधण्याचे काम करण्यात आले मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तब्बल अडीच कोटी रुपये सावित्री नदीच्या पाण्यात वाहून जाणार असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की महाड तालुक्यातील सव येथे गरम पाण्याचे कुंड आहे त्या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात मात्र या ठिकाणी जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वहूर येथून बोटीतून जाणे सोयीस्कर असल्याने अनेक पर्यटक बोटीतून जाणे पसंत करतात मात्र पूर्वीची जेटी नादुरुस्त झाल्याने त्या ठिकाणी नवीन जेट्टीचे काम महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मंजूर करण्यात आले.

महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील एस .जे.कन्स्ट्रक्शन कंपनीला0. 75 टक्के कमी दराने 2, 42,77,122 लक्ष रुपयांचे काम या कंपनीला देण्यात आले त्याचा दोष दायित्व कालावधी 36. महिन्याचा आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वहूर येथील जेटीचे काम करताना ठेकेदाराने वाळू ऐवजी ग्रिट चा वापर तर केलाच आहे मात्र नवीन जेटीचे चे काम न करता जुन्याजेटीला सहा इंचाची काँक्रीट ची कव्हरिंग करून सदरचे काम नवीन केल्याचे दाखविले आहे.महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वहूर येथील जेटीचे काम चालू असताना महाराष्ट्र सागरी मंडळाचा एकही शाखा अभियंता तसेच उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यापैकी एकही अधिकारी काम चालू असताना प्रत्यक्ष जागेवर हजर नव्हता त्यामुळे ठेकेदाराने मनमानी पद्धतीने वाळू ऐवजी ग्रिट वापरून हे काम घाईघाईत पूर्ण केले आहे.

वहूर येथील जेटीचे काम चालू असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ते जेटी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी काँक्रीट चा रस्ता बनवण्यात आला आहे त्या रस्त्यासाठी निकृष्ट दर्जाचा डबर वापरला गेला आहे .याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करणार आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाचे वहूर येथील जेटीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून सागरी मंडळाचे तब्बल अडीच कोटी रुपये सावित्रीच्या पाण्यात वाहून गेल्यात जमा आहेत याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळ संबंधित ठेकेदारावर कोणती कारवाई करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

एकीकडे जेटीच्या कामातील दर्जा संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात असतानाच या परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीबाबतही आश्चर्य व्यक्त होत असून या विभागाने यासंदर्भात वस्तुनिष्ठ खुलासा करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वहुर येथील जेटीवर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यामधील मधोमध विद्युत खांब आहे तो न हटवितात रस्ता केला आहे. याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा विद्युत पोल काढण्यात येईल मात्र विद्युत पोल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी वीज वितरण कंपनीला पैसे अदा करावे लागतात ते कोण करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

काँक्रीट रस्त्याचे काम देखील निकृष्ट दर्जाचे!

वहुर येथील जेटीवर जाण्यासाठी तयार करण्यात आलेला काँक्रीटच्या रस्त्याचे काम देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असताना या कामादरम्यान एकही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा अधिकारी जागेवर हजर नव्हता असे समजते. एकंदरीत वहुरजेटीचे काम म्हणजे चराऊकुरण असल्याचे या निमित्ताने निष्पन्न होत आहे वराटीजेटीनंतर वहूर येथील जेटीचे काम देखील वादात सापडले आहे एकंदरीत निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा विडाच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी उचलल्याचे या निमित्ताने पाहण्यास मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT