खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
महाड खाडीपट्टा वासियांना एकमेव असलेल्या खैरे धरणाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडाला असून ऐन शिमगोत्सवाच्या दरम्यान खाडीपट्टयातील गोमेंडी मुळगाव, गोमेंडी ताडवाडी आणि गोमेंडी बौध्दवाडी येथील नागरिक पाण्याविणा तहानलेले आहेत. येथील गावातील नागरिकांना रत्नागिरी जिल्हयाच्या म्हाप्रळ गावावरुन पाणी विकत घ्यावे लागत आहे. चार दिवस गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळाले नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
खाडीपट्टयामध्ये मोठ्या प्रमाणात महाड औद्योगिक विकास महामंडळातील रासायनिक कारखान्यांचे जल प्रदूषण सांडपाणी खाडीच्या निमूळत्या पात्रामध्ये सोडल्यामुळे येथील पिण्याचे पाण्याचे स्तोत्र प्रदूषित झाले आहेत. त्यामुळे एकमेव खैरे धारणाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेशिवाय पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे गेली दोन दशकांपेक्षा अधिक काळ अविरत खैरे धरण सुरुवातीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, तर सद्यस्थितीत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा होत आहे. मात्र पाईपलाईन लिकेज, मोटार जळणे त्याचबरोबर वारंवार गढूळ पाण्याचा पुरवठा ही समस्या मोठ्या प्रमाणात असून योजनेअंतर्गत असलेल्या नागरिकांना वारंवार याचा मोठा फटका वारंवार बसत आहे.
गोमेंडी मुळगाव, ताडवाडी आणि बौध्दवाडी या गावांना पाणी पुरवठा होत असलेल्या पंपावरील मोटार जळली असून शनिवारी तेथील स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरुन चौथ्या दिवशी देखील पाण्याचा पुरवठा झाला नसल्याचे नागरिकांनी सांगुन संबधित ठेकेदाला सहकार्य आम्ही ग्रामस्थांनी करुन देखील मोटार दुरुस्ती न केल्यामुळे आम्हाला पाणी मिळू शकलेला नाही असे स्थानिक नागरिक संतोष उंडरे यांनी सांगितले.
पाणीपट्टी थकीत राहिल्यास कारवाईचा बडगा उगारून पाणीपट्टी भरण्यास पाणीपट्टी धारकांना वेठीस धरले जाते, मात्र त्यांना त्यांच्या हक्काचे पुरेसे पाणी मिळत नसेल, तर त्यावर कार्यवाही का केली जात नाही ? असा सवाल पाणीपट्टी धारकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तात्काळ महाड ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महाड उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही समस्या कायमची सोडवावी अशी तेथील लाभार्थी पाणीपट्टी धारकांनी केली आहे.
मोटार खराब होऊन आज चौथा दिवस आहे. ठेकेदार मजर व नदीम यांना वारंवार सांगुन सुद्धा काही फरक पडत नाही. शनिवारी सकाळी मोटार रिपेअरिंगसाठी पाठवली तीही आमच्या लोकांनी गाडीत भरुन दिली, मात्र ठेकेदार सांगतात की, आज मशिन रिपेअर होईल, उद्या बसेल म्हणजे परवा पाणी मिळेल. याचा अर्थ सहा दिवसांनी सुध्दा आम्हाला पाणी मिळेल की नाही हे पण अजून सांगता येत नाही, ही येथील वस्तुस्थिती आहे.संतोष उंडरे, गोमेंडी मुळगाव