Water Shortage Pudhari
रायगड

Water Shortage: खाडीपट्ट्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण; ऐन लग्नसराईत तीव्र पाणीटंचाई

गेली तीन दिवस पाणीच नाही; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा पवित्रा

पुढारी वृत्तसेवा

खाडीपट्टा: महाड खाडीपट्टयातील 21 गावांसाठी जीवन संजीवनी ठरलेल्या खैरे धरणावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून ऐन लग्नसराईसह रखरखत्या उन्हाच्या मे महिनामध्ये पाणीपट्टी धारकांचे पाण्यावाचून हाल झाले असून टँकरद्वारे पाणी विकत मागवावे लागत आहे.

गेली पाच-सहा वर्षे ही परिस्थिती जैसे थे असून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे नेहमीचेच बारा वाजल्याचे पाहायला मिळत असून संतप्त झालेल्या नागरिकांचा आंदोलनाचा पावित्रा उचलण्याचा निर्णय झाला आहे. लोकप्रतिनिधींना मात्र याचे काहीही देणे घेणे नसल्याचे काही अंशी पाहायला मिळत आहे.

महाड तालुक्याच्या खाडीपट्टयामध्ये 21 गावांसाठी जीवन संजीवनी ठरत असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या खैरे धरणातील पाणी योजनेचा वारंवार बोजवारा उडाला असल्याचे पाहायला मिळत असून संबंधित पाणीपट्टी धारकांना वेळेमध्ये पाणी मिळत नाही, तर येणारे पाणी देखील गढूळ असल्याचे पाणीपट्टी धारकांनी सांगितले आहे.

विविध कारणांनी या ठिकाणी दर वेळेस तीन ते चार दिवसांच्या कालावधीमध्ये पाणी या भागामध्ये संबंधित पाणीपट्टी धारकांना मिळत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. गेली तीन दिवस खाडीपट्टा भागामध्ये पाणी येत नाही.

पाणीपट्टी थकबाकी राहिल्यास कायद्याने कारवाई केली जाते, मात्र त्याच कायद्याचा अवलंब करून पाणीपट्टी धारकांना वेळेमध्ये दर दिवशी पाणी उपलब्ध का होत नाही? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. जलजीवन मिशनचे तर या ठिकाणी काम अजून पूर्ण झालेले नाही.

अजून देखील कित्येक ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या योजनेची मुदत संपलेले असताना देखील आजतागायत पाणीपट्टी धारकांच्या घरी नळाद्वारे या योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. तर ज्या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्या गावातील रस्ते खोदून रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था उडवली आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत असलेल्या खैरे धरणावरील मुख्य टाकीवरील कधी पंप जळणे, कधी मोटर जळणे, तर कधी पाईप लिकेजसारख्या वारंवार घटना समोर येऊन त्यामुळे सलग तीन-चार दिवस वारंवार पाणीपट्टी धारकांना पाणी मिळण्यास विलंब लागत असल्याच्या तक्रारी वारंवार पाणीपट्टी धारकांकडून होत आहे.

गेली तीन दिवस पाणी नागरिकांना उपलब्ध झालेला नाही, तर अपूर्वी आठ दिवस पाणी मिळालेला नाही. तर संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध करून घेतल्यानंतर समजले की खैरे धरणावर पंप जळले आहे.

मे 2025 रोजी जल जीवन मिशनच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र एक वर्ष पूर्ण होऊन देखील आजतागायत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा सातत्याने होत नसला तरी देखील पाणीपट्टी वसुली मात्र वेळेमध्ये केली जात आहे.

तर पाणीपट्टी वेळेमध्ये भरली जात असताना देखील वेळेमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी ग्रामीण पाणी पुरवठा महाड कार्यालयात अनेक वेळा उंबरडे झिजवून देखील आजतागायत घरगुती नळावर पाणी पोचलेले नसल्याची तक्रार चिंभावे येथील नागरिकांनी केली आहे.

गेली तीन दिवस आम्हा नागरिकांना पाणी मिळालेला नाही, तर यापूर्वी आठ दिवस पाणी सलग मिळालेले नाही आणि ऐन लग्नसराई आणि रखरखत्या मे महिन्याच्या उन्हामध्ये पाण्या वाचून येथील नागरिकांचे हाल झाले आहेत. आमचे संतप्त झालेले नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
- भरत गोठल, माजी सरपंच, ग्रामपंचायत वराठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT