महाड: मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळी उशिरा शहराच्या विविध भागांत पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. रात्री दोन वाजेपर्यंत पाणी वाढल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. दादली पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुराची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने रात्री उशिरा भोंगे वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला.
सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रभात कॉलनी आणि मुख्य बाजारपेठेतील पाणी ओसरू लागल्याची माहिती महाड नगर परिषद अग्निशमन दलाने दिली आहे. पहाटे ८.१७ मीटरपर्यंत पोहोचलेली पाणीपातळी आता ७.४० मीटरपर्यंत खाली आली आहे.
प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय
हवामान विभागाने आगामी २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता, प्रशासनाने नागरिकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले असून, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाड नगरपालिकेच्या इमारतीत आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
रात्रभर अधिकाऱ्यांचे नियंत्रण
पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रांताधिकारी ओमासे, तहसीलदार शितोळे, युवा नेते विकास गोगावले, नगराध्यक्ष कविस्कर, नगरसेवक आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रात्रभर परिस्थितीचा आढावा घेत होते. दरम्यान, सायंकाळी काही काळ खंडित झालेला विद्युत पुरवठा पहाटेपर्यंत पूर्ववत झाल्याने या अडचणीच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.