महाड : श्रीकृष्ण बाळ
उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच लिंबू सरबताची मागणी वाढत असताना, लिंबाच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे हे ‘विटामिन सी’ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र महाडच्या बाजारपेठेत दिसून येत आहे.
सध्या शहरातील किरकोळ बाजारात एका लिंबासाठी सुमारे दहा रुपये मोजावे लागत असून, छोट्या आकारातील लिंबू वीस रुपयांना तीन ते चार या दराने विकले जात आहेत. परिणामी, घरगुती वापरावर मर्यादा येत असून ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यात सध्या लिंबाचे उत्पादन घटल्याने कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर लिंबाची आवक होत आहे. घाऊक बाजारात 50 किलोच्या पिशवीमागे दर सुमारे साडेचार हजार ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अधिक रसाळ आणि जुन्या लिंबाला जास्त मागणी असल्याने त्यांचे दर तुलनेने अधिक असून, नव्या हिरव्या लिंबाचा दर काहीसा कमी आहे.
ही दरवाढ मे महिन्याच्या अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मे महिन्याच्या मध्यावर राज्यातील नवीन पीक बाजारात दाखल झाल्यानंतर दरात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
उष्णतेच्या तीव्रतेमुळे ज्यूस आणि सरबत केंद्रांवर गर्दी वाढली आहे. पूर्वी दहा रुपयांना मिळणारे लिंबू सरबत आता 15 ते 20 रुपयांपर्यंत विकले जात असल्याने ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे.
लिंबामध्ये ‘विटामिन सी’ मुबलक प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. उष्माघातापासून संरक्षण आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू सरबत फायदेशीर ठरते. मात्र वाढत्या दरामुळे अनेक ग्राहक स्वस्त पर्याय म्हणून बाटलीबंद आणि कृत्रिम पेयांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये अशा पेयांचे वाढते प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, अशी चिंता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्यात महिलांकडून पापड, लोणची आणि विविध सरबत तयार करण्याचा पारंपरिक उपक्रम राबविला जातो. लिंबाच्या वाढलेल्या दरामुळे या तयारीवरही मर्यादा येत असून, महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एकूणच, लिंबाच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, नैसर्गिक लिंबू सरबत महागडे ठरत आहे. आगामी काळात दरात घट झाल्यास नागरिकांना पुन्हा या पारंपरिक पेयाचा सहज आस्वाद घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.