पोलादपूर: गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच संपूर्ण कोकणासह महाड, पोलादपूर, माणगाव, खेड, रत्नागिरी परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींच्या स्वागताची तयारी जोरदार सुरू झाली असून, सर्वत्र गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहात साजरा होणाऱ्या सणांपैकी एक मानला जातो.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच इतर शहरांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे परततात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच मुंबई आणि परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
यंदाचा गणेशोत्सव अधिक आकर्षक आणि भक्तिमय करण्यासाठी विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी तयारीला वेग दिला आहे. मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, आकर्षक देखावे, फुलांची सजावट आणि विविध प्रकारचे डेकोरेशन यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
काही मंडळांकडून सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्याची तयारी सुरू असून, बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन केले जात आहे.जिवंत देखावे, पौराणिक कथेवर आधारित चलचित्र , ज्वलंत प्रश्न वर देखावा साकारण्यात येत आहेत
गणेशमूर्तींच्या आगमनाची तयारीही अंतिम टप्प्यात आली असून, आपल्या बाप्पाची मूर्ती कधी घरी येणार याची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. घराघरांत साफसफाई, रंगरंगोटी, सजावट आणि पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू झाली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्येही मोठी लगबग सुरू झाली आहे. विविध प्रकारचे हार, फुले, आकर्षक तोरणे, मखर, विद्युत माळा, सजावटीचे साहित्य आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.
यंदा बाप्पासाठी नवीन आणि आकर्षक सजावट करण्याकडे गणेशभक्तांचा कल दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि उपनगर ,सुरत पुणे पिंपरी चिंचवड मध्ये राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावांकडे रवाना होत आहेत. एसटी बसेस तसेच खासगी ट्रॅव्हल्समधून मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत.
महाड, पोलादपूर, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी यांसह कोकणातील विविध गावांकडे जाणाऱ्या मार्गांवर चाकरमान्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन
गणेशोत्सवाच्या काळात गावातील नातेवाईक, मित्रमंडळी आणि मुंबईत राहणारे चाकरमानी एकत्र येत असल्याने या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता आपली माणसे, नाती आणि गावाशी असलेले नाते अधिक घट्ट करणारा उत्सव ठरतो.
गणपती बाप्पाच्या आगमनानंतर कोकणातील गावागावांत उत्साहाला आणखी उधाण येणार आहे. घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना, आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.