रायगड : जयंत धुळप
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जन-धन योजनेने (पीएमजेडीवाय) कोकण विभागात मोठी झेप घेतली असून, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कोकणात तब्बल 55 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या खात्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनी बँकिंग प्रवाहात कोट्यवधींच्या ठेवी जमा केल्या असून, ठाणे जिल्हा यात अव्वल ठरला असून या जिल्ह्यात सर्वाधिक 827 कोटी 86 लाखांच्या तर रायगड जिल्ह्यात 417 कोटी 40 लाखांच्या ठेवी असल्याची माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहाणी अहवाल-2025-26 मधून स्पष्ट झाली आहे.
रायगडमध्ये 6 लाख 73 हजार 814 खाती
कोकण विभागातील आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 16 लाख 13 हजार 980 जन-धन खाती आहेत. या खात्यांमध्ये 827 कोटी 86 लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. तर रायगड जिल्ह्यात 6 लाख 73 हजार 814 खाती उघडण्यात आली असून, त्यामध्ये 417 कोटी 40 लाख रुपये जमा आहेत. रायगडमध्ये 4 लाख 60 हजार 377 ग्राहकांना रुपे कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
जन-धन योजनेची सुरुवातीची ओळख शून्य शिलकीची खाती अशी होती. मात्र, आता नागरिक या खात्यांचा वापर बचतीसाठी करत असल्याचे दिसून येते. कोकणात आजही अंदाजे 6.3 लाखांहून अधिक खाती अशी आहेत, ज्यात किमान शिलकीची मर्यादा नाही. यामध्ये ठाणे आणि मुंबई उपनगर ही शहरे आघाडीवर आहेत.
41 लाख ग्राहकांकडे रुपे कार्ड
कोकण विभागातील एकूण 55 लाख 38 हजार जन-धन खात्यांपैकी 41 लाख 26 हजार ग्राहकांना रुपे कार्ड देण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता देखील डिजिटल व्यवहारांशी जोडली गेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्येही बँकिंग साक्षरता वाढत असून, तिथे अनुक्रमे 263 कोटी आणि 145 कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात जन-धन योजनेला कोकणात यश आले आहे. यामुळे शासकीय योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणे अधिक सुलभ झाले आहे.
प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरु करण्यात आली होती. तिचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडणे हा होता. विशेषतः गरीब वर्गातील लोकांना जे बँकेच्या सुविधांपासून दूर होते, त्यांना या योजनेअंतर्गत थेट बँकिंग सेवांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला.