रघुनाथ भागवत
खाडीपट्टा: ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन ही प्रभावी योजना राबविण्यात आली. सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या मात्र सद्या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु असून जवळजवळ 60 टक्के काम पूर्णत्वाला गेले असल्याचा दावा संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांनी केला असून काम पूर्ण झालेल्या गावांची यादी देखील हाती लागली आहे.
ग्रामीण जनतेला मुबलक व स्वच्छ पाणी घरगुती नळाद्वारे उपलब्ध व्हावे या चांगल्या हेतून ही योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये पाईपलाईन टाकणे, जलसाठ्यासाठी टाक्या बांधणे, जलस्रोत उपलब्ध करणे, स्त्रोतांचे पुनर्जीवन करणे आदी कामे योजनेअंतर्गत करण्यात आली. सद्यस्थितीला खैरे धरणावरील या प्रादेशिक योजनेचे काम प्रगतीपथावर असून 60 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा जल जीवन मिशनने करून उर्वरित कामे प्रगती पथावर असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमधून 21 गावांपैकी 13 गावांना नवीन पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला आहे. त्यामध्ये 1 मार्च पासून सुतारकोंड, खैरांडे, मुळगाव, उभटआळी, तर 1 एप्रिल पासून ओवळे, तेलंगे गाव, तेलंगे मोहल्ला, बेबलघर, चिंभावे हळदवणे, चिंभावे सुतारकोंड, दत्तवाडी, चिंभावे मोहल्ला, वराठी, गोमेंडी, ताडवाडी, वलंग, बौद्धवाडी, विठ्ठलवाडी, मुळगाव या गावांमध्ये या योजनेचे काम पूर्णत्वाला गेले आहे. तर 30 मे पर्यंत सोनघर, जुई बु., लोअर तुडील, रोहन गाव बाकी आहे.
खैरे तर्फे तुडील बाकी आहे, तसेच कुंबळे येथील टाकी पर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे काम थांबले आहे. रावढळ जवळ पुलाचे काम सुरु असल्यामुळे पुढील 4 गावांना पाणी पुरवठा करता आलेला नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून पत्राद्वारे माहिती प्राप्त झाली आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत खाडीपट्टयातील 21 गावांना होणारा पाणीपुरवठा खैरे धरणाच्या माध्यमातून गेली तीन दशकांपासून होत असून खरे तर खैरे धरण हे येथील नागरिकांसाठी जीवन संजीवनी ठरले आहे.
एकीकडे खाडीपट्टयात औद्योगिक विकास महामंडळाच्या रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक जल प्रदूषणामुळे येथील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत पूर्णपणे प्रदूषित झालेले असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता.
खैरे धरणाच्या सुरुवातीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नंतर ग्रामीण पाणी पुरवठा ही योजना राबवून गावातील खाजगी आणि घरगुती नळाद्वारे पाणी सोडण्यात आले आणि येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा अगदी अत्यंत जवळचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला.
नळ पाणी पुरवठा योजना ठरतेय नागरिकांच्या हिताची
30-35 वर्षे जीर्ण झालेल्या पाईप लाईनमुळे गेली अनेक वर्षे पाईपलाईन लिकेची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती, त्यानंतर केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनचे काम सुरू झाले आणि साडे तीन दशकांपूर्वी टाकण्यात आलेल्या भिडाच्या पाईपलाईनने वारंवार होणाऱ्या लिकेज समस्येवर मात झाली आहे.
आता पूर्णपणे नव्याने टाकण्यात आलेल्या जलजीवन मिशनच्या पाईपलाईन आणि पुरवठा टाक्या नव्याने बांधल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे.अतिशय संथ गतीने सुरू झालेल्या या योजनेने अखेर आता नागरिकांना पाणीपुरवठा टाक्यांपर्यंत केला आहे. सदर टाक्यामधून गावातील पूर्वीच्याच पाईपलाईनने घरगुती नळाद्वारे सद्यस्थितीला पाणीपुरवठा होत आहे, मात्र येत्या काही दिवसांमध्ये पाणी पुरवठा नवीन पाईपलाईनने करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.