Shrivardhan Rain pudhari photo
रायगड

Shrivardhan Rain : श्रीवर्धनमध्ये पावसाची दमदार सलामी

१०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद, शेतकरी राजा सुखावला, शेतीकामांना वेग

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : अनिकेत मोहित

गेल्या काही दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यात अखेर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उन्हाच्या कडक झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना तसेच पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकरी बांधवांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.तालुक्यात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, यामुळे यंदाच्या पावसाळ्याची दमदार सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे रखडली होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग चिंतेत होता. मात्र आता झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भातशेतीसाठी आवश्यक असलेली पावसाची सुरुवात वेळेत झाल्याने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. उष्णतेच्या लाटांमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, सर्वसामान्य नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. ग्रामीण भागात पावसाच्या सरींनी निसर्ग पुन्हा हिरवाईने बहरण्यास सुरुवात झाली आहे.

पावसामुळे केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळणार आहे. शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण भागातील विविध घटकांना या पावसामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या या आगमनामुळे श्रीवर्धनकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पुढील काळातही पावसाचा जोर असाच कायम राहावा, अशी अपेक्षा नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीवर्धनच्या निसर्गसौंदर्यात पावसामुळे भर पडणार असून, डोंगर-दऱ्या, शेती आणि परिसर पुन्हा हिरवाईने नटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. समाधानकारक पावसामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, शेतकरी वर्ग आता नव्या उत्साहाने शेतीच्या कामांना सुरुवात करण्याच्या तयारीत आहे.

पावसाने जलस्त्रोत प्रवाहित

गेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर बनत चालला होता. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता निर्माण झाली होती. विहिरी, तलाव आणि नैसर्गिक जलस्रोतांची पाणी पातळी कमी झाल्याने नागरिकांना भविष्यातील पाणीटंचाईची भीती वाटत होती. मात्र झालेल्या दमदार पावसामुळे आता या जलस्रोतांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT